कांदा रडवणार; दिवसागणिक वाढतोय भाव

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - सोमवारी ७० रुपये किलो असणारा कांदा मंगळवारी घाऊक बाजारात ८० रुपये किलोवर पोहोचला. त्यामुळे घाऊक कांदा बाजारात तेजीचे वातावरण कायम असल्याचे पाहायला मिळाले. मात्र परदेशी, कमी भावाचा कांदा बाजारात असूनही देशी कांद्याची भाववाढ शंभरीकडे सुरू असून, यापुढे कांदा सर्वसामान्यांना रडवण्याची चिन्हे आहेत. 

वाशीच्या घाऊक कांदा-बटाटा बाजारात चांगला कांदा ७५ ते ८० रु किलो भावाने विकला गेला. मुळातच पुणे-नाशिक येथील स्थानिक कांदा बाजारपेठांमध्ये कांद्याचा भाव वाढत असल्याने मुंबईतही जास्त भाव मिळत आहे. दिवाळीपर्यंत तरी हेच चित्र सर्वत्र असण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाव वाढल्याने घाऊक बाजारात कांद्याला तुलनेने कमी उठाव मिळाला. कांदाखरेदीसाठी आलेल्यांनी भाववाढीमुळे खरेदी करताना हात आखडता घेतला. दुसरीकडे भाव नियंत्रणात राहावा म्हणून इराणमधून मागवलेल्या कांद्याचाही या कांद्याच्या भाववाढीवर परिणाम झाला नाही. हा परदेशी कांदा कमी किमतीचा असल्याने त्यांच्या खरेदीसाठी ग्राहक पुढे येतील व राज्यातील कांद्याचा भाव कमी होईल, अशी अपेक्षा काही कांदाव्यापाऱ्यांना होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. 

आत्तापर्यंत कांद्याच्या गाड्यांची आवक ५० ते ५५ गाड्या इतकीच होत होती. मात्र सध्या हॉटेले सुरू झाली असल्याने कांद्याला बाजारात मागणी आहे. त्यानुसार घाऊक बाजारात मंगळवारी ७६ कांद्याच्या गाड्यांची आवक झाली आहे. दरम्यान, किरकोळ बाजारात कांदा ९० ते ९५ रुपये किलोने विकला जात आहे. 

साठेबाजांकडून भाववाढ

साठेबाजांकडून कांद्याची भाववाढ केली जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. लॉकडाउनमध्ये राज्यात कांद्याचे पीक उत्तम आले होते. मात्र हा कांदा बाजारात येऊ शकला नसल्याने गोदामातच अडकून राहिला. त्यात लांबलेल्या पावसामुळे कांदा खराब झाल्याचा फायदा हे साठेबाज घेत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

भाव वाढायला सुरुवात झाली की खरेदीदार हात आखडता घेतात. त्यानुसार आत्ता कांद्याच्या खरेदीवर बाजारात परिणाम दिसू लागला आहे. स्थानिक बाजारात भाव वाढला की, त्याचा परिणाम मुंबईतील बाजारावर होतो आणि भाव वाढतात. सध्या हीच परिस्थिती आबे. पुढच्या काही दिवसांत कांद्याच्या भावाबाबतचे चित्र स्पष्ट होईल. - राजेंद्र शेळके, अध्यक्ष, कांदा-बटाटा आडत संघ

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post