मंदिर, रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार, लोकल, रेल्वेबाबत निर्णय नाही



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - येत्या काही दिवसात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेनं सुरु करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. येत्या ३ ते ४ दिवसात याबाबतचा ठोस निर्णय होण्याची चिन्हं आहेत. असं असलं तरी मुंबईकरांना लोकल रेल्वेसाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे. कारण लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकार अद्याप तयार नसल्याचं कळतंय.

दरम्यान राज्यातील मंदिरांसाठी ई-दर्शनाच्या माध्यमातून मर्यादित संख्येनं देवदर्शन करता येऊ शकेल, अशी पद्धत अवलंबण्याबाबत टास्क फोर्समध्ये चर्चा झाली. ई-दर्शन किंवा मंदिरात जाण्याची वेळ बूक करता येऊ शकेल, त्यानुसार मंदिरातील गर्दी टाळता येईल. रेस्टॉरंटमध्ये पार्सलव्यक्तिरिक्त 10 टक्के क्षमतेची बैठक व्यवस्था अर्थात सीटिंग अरेंजमेंटमध्ये रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत विचार आहे.

लोकल वेटिंगवर

 मुंबईतील लोकल सुरु होण्यास अजून वाट बघावी लागणार आहे. जोपर्यंत मुंबईच्या आजूबाजूचा परिसर, एमएमआर भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईतील लोकल सुरु होण्याची शक्यता कमी आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भातही टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र अद्याप कोणताही निर्णय नाही. लोकलप्रमाणेच शाळा सुरु होण्यासही काही काळ वाट बघावी लागणार आहे.

कोरोना संकटामुळे राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अंतर्गत अनेक सेवा सुरळीत झाल्या. मात्र मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल रेल्वे अजूनही बंद आहे. त्याचा ताण रस्ते वाहतुकीवर पडत आहे. त्यामुळे मुंबईकर ट्रॅफिक जॅमने हैराण झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post