मुंबई, ठाण्यात १०८ कोरोनाचे बळी






माय अहमदनगर वेब टीम
ठाणे/ मुंबई  - मुंबई, ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. मंगळवारी मुंबईत 717 तर ठाणे जिल्ह्यात 1 हजार 209 नवे रुग्ण सापडले. दुदैवाने ठाणे जिल्ह्यात 53 आणि मुंबईत 55 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची  संख्या 81 हजार 250 झाली असून मृतांचा आकडा 2 हजार 242 वर गेला आहे. तर मुंबईतील एक लाख 10 हजार 846 रुग्ण तर 6 हजार 184 मृत्यू झाले आहेत.  ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केल्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. झपाट्याने वाढणार्‍या रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य यंत्रणांना यश आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मंगळवारी 1209 नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील 55 हजार 869 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 23 हजार 139 रुग्ण सक्रिय आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ही मुंबईपेक्षा जास्त आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 326 वर पोहचला आहे. रुग्ण संख्येत लक्षणीय घट होत असताना नवे 207 रुग्णांची भर पडली आहे. आता कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 32 झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातही गेल्या चोवीस तासात 9 रुग्ण दगावल्याने मृतांचा आकडा 608 वर गेला आहे. 191 नव्या रुग्णांमुळे शहरातील रुग्णांनी 18  हजार 149 चा पल्ला गाठला आहे.  

आयुक्तांची बदली करूनही नवी मुंबईतील रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. नव्याने 320 रुग्ण सापडले असून 14 हजार 252 रुग्ण संख्या झाली आहे. आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांची आकडा 402 वर गेला आहे.  मीरा-भाईंदर क्षेत्रात 156 नवे रुग्ण सापडले असून पाच रुग्णांचे बळी गेले आहेत. सात हजार 838 रुग्ण झालेल्या मीरा-भाईंदरमध्ये  261 वर  मृतांचा आकडा गेला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post