आमदार काय बैल जोडी आहे का कोणीही पळवून नेईल?





माय अहमदनगर वेब टीम
जळगाव - मध्यप्रदेशपाठोपाठ आता राजस्थानमध्ये भाजपकडून काँग्रेस सरकार पडण्याच्या हालचाली सुरु आहे. राजस्थाननंतर महाराष्ट्रातही हा प्रयोग भाजपकडून सुरु असल्याची चर्चा आहे. सध्या भाजप आशेवर जगत असून त्यांनी महाराष्ट्रात सत्तेची स्वप्न पाहू नये, असा टोला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांनी शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे 170 आमदारांचा पाठिंबा आहे. आमदार काय बैल जोडी आहे का कोणीही पळवून नेईल? असाही सवाल ना. पाटील यांनी उपस्थित करुन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाहून म्हणाले की, मला कोरोना झाल्यास शासकीय रुग्णालयातच दाखल करा, असे सांगितले. यावर देखील ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धतीवर विश्वास आहे. शासकीय रुग्णालयात सध्या चांगले उपचार दिले जात असल्याने त्यांनी ती इच्छा व्यक्त केली असेल. मात्र, त्यांना कोरोना होऊ नये, अशी देवाला प्रार्थना करतो, असा चिमटा ना. पाटील यांनी काढला.

ना. पाटील पुढे म्हणाले की, जिल्हयातील एका खासदारांनी शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने विम्याचे पैसे भरले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना विमा मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे,अशी टीका करणार्‍या खासदार उन्मेष पाटील यांचे नाव न घेता केंद्र सरकारने पीक विमासंदर्भात शेतकर्‍यांवरील जाचक अटी लादून एकप्रकारे अन्याय केला आहे. खासदारांमध्ये दम असेल तर केंद्र सरकारने लावलेले निकष बदलविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले. अडचणीच्यावेळी शेतकर्‍यांच्या पाठिशी राज्य सरकार नेहमी उभे असून बोगस बियाण्यांसंदर्भात शेतकर्‍यांनी पावती देवून कृषी विभागाकडे तक्रार करावी, कृषी विभाग त्या कंपनींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post