‘पारनेरातील नगरसेवकांना अजितदादांनी फोडलं असं म्हणता येणार नाही’



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव असल्याच्या चर्चा रंगल्या. पण आता ‘पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही,’ असे स्पष्ट करून या वादावर पडदा टाकला आहे.

पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावरून दोन्ही पक्षांत कुरबूर सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले की, पारनेरच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक स्तरावरचा विषय होता, तो त्या पातळीवरच संपायला हवा होता.

आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय चर्चेत येऊ नये, असे मला वाटते. स्थानिक राजकारणाचा भाग होता. यापुढे असा निर्णय घेताना एकमेकांशी बोलावे. काही गोष्टी अनावधनाने घडत असतात. त्या प्रसंगाचे काय होईल याची कल्पना नसते, जिथे व्हायची तिथे चर्चा झाली आहे. त्यामुळे कुरबुरी, धुसफूस आहे असे बोलू नये.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यापारी महासंघासोबत बैठक घेऊन विविध प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी पवारांनी महाविकास आघाडीतील धुसफूस, पारनेर नगरसेवक फोडाफोडी, करोना संकट, याबाबत भाष्य केलं. पारनेरचा मुद्दा खूप छोटा आहे, त्याचा राज्यावर काही परिणाम होणार नाही. तसंच मातोश्रीवर जाण्यात कमीपणा काय? असा सवाल शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post