शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : आ. संग्राम जगताप.
संत निरंकारी सेवादलच्यावतीने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात स्वच्छता मोहीम
माय अहमदनगर वेेेब टीम
अहमदनगर : संत गाडगेबाबा यांनी अनेक वर्षांपूर्वी स्वच्छतेचे महत्त्व देशाला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले आहे. गावोगावी स्वच्छतेतून आरोग्याचे महत्त्व समाजाला कळावे, यासाठी ते अनेक ठिकाणी जाऊन सांगत असत. दगडात नव्हे तर माणसांत देव पाहण्याचे त्यांनी शिकविले. गाडगेबाबांचे विचार स्व. आर. आर. पाटील यांनी हागणदारीमुक्ती योजनेतून गावांना दिशा दिली. आता देशाचे पंतप्रधान भारत स्वच्छ अभियानातून स्वच्छतेचे महत्त्व देशाला दाखविले आहे. स्वच्छतेमुळे माणसाचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यास मदत होते, यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. नगर शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी विविध संस्थांनी पुढे येऊन स्वच्छतेचा संकल्प करावा. संत निरंकारी सेवा दल, अहमदनगर यांच्यावतीने सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबवून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
संत निरंकारी सेवादल व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्यावतीने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आली. यावेळी आ. संग्राम जगताप, हरिश खूपचंदानी, आनंद कृष्णानी, नगरसेवक अविनाश घुले, संभाजी पवार, अभिजित खोसे व सेवादलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
यावेळी बोलताना हरिष खूपचंदानी म्हणाले की, संत निरंकारी सेवा दलच्या वतीने आज सकाळी ७ वाजल्यापासून सिव्हिल हॉस्पिटल परिसरात स्वच्छता अभियान राबविले. प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व अंगिकारले पाहिजे. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणेतून आम्ही सामाजिक उपक्रमाचे काम वर्षभर राबवत असतो. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी
व नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी परिसर स्वच्छ राखणे अत्यंत आवश्यक असून, त्यामुळे रोगराईस आळा बसण्यात मदत होते.
यासाठी प्रत्येकाने स्वच्छता अभियानात भाग घेऊन आपले शहर स्वच्छ करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.
Post a Comment