राज्यात पुन्हा अवकाळीचा धोका !


माय अहमदनगर वेब टीम
श्रीरामपूर – श्रीरामपूर, राहाता, संगमनेर तालुक्यांतील अनेक भागांत शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. या अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने आगास केलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, लसूण आदी पिकांना मोठा धोका निर्माण होणार आहे. बहार धरलेल्या डाळिंब बागांना फुटवे फुटण्याच्या भीतीने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसाच्या हजेरीने बळीराजा धास्तावला आहे. सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला. या नुकसानीतून सावरत नाही तोच आता पुन्हा अवकाळीचे संकट येऊन ठेपले आहे.

शनिवारी श्रीरामपूर शहरासह लगतच्या टिळकनगर, दत्तनगर तसेच तालुक्यांतील नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, सराला-गोवर्धन, निमगाव खैरी परिसरात सुमारे 1 तासापेक्षा जास्त वेळ झिमझिम पाऊस झाला. तसेच गोंडेगाव, खानापूर, माळवाडगाव, भामाठाण, मातुलठाण, पढेगाव, बेलापूर, मातापूर, भोकर, खोकर, टाकळीभान, घुमनदेव, वडाळा महादेव यासह अनेक भागात पावसाची रिमझिम झाली. उंदीरगाव परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचा गहू जमिनीवर झोपला आहे.

वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे हा परिसर अंधारात होता. खैरी निमगाव येथे शनिवारचा बाजार दिवस होता. अचानक ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने भाजीपाला विक्रेत्यांसह, खरेदीदारांसह सर्वांची तारांबळ उडाली. प्रथमच रात्री उशिरापर्यंत भाजीपाला विक्रेते, कापड, किराणा, भेळ विक्री करणारे थांबले मात्र तरीही काही खरेदीदारांना भाजीपाला मिळाला नाही. पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. या पावसामुळे दुचाकीस्वार तसेच पादचार्‍यांचीही धावपळ झाली. शहर व परिसरात रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पावसाची रिमझिम सुरु होती.

काल सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक रिमझिम पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट सुुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस शक्यता जाणवत होती. सध्या आगास केलेली ज्वारी, हरभरा, कांदा पिके काही भागात काढणीस आलेली आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस झाला तर या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. दरम्यान, चालू वर्षी रब्बी हंगामात पुरेशा प्रमाणात थंडी पडली नाही तसेच सतत ढगाळ हवामान राहिल्याने अगोदरच सर्वच पिके रोगराईने ग्रासलेली आहे. चालू वर्षी मोठा खर्च औषध फवारणीवर झालेला आहे. त्यामुळे त्याचा फटका उत्पन्नातून जाणवणारच आहे. असे असताना आता अवकाळीचे संकट आल्याने शेतकरी धास्तावला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post