आमचा विजय पक्का - दिलीप गांधी



माय नगर वेब टीम

अहमदनगर - देशात आणि राज्यात भाजप-सेनेचे सरकाराने गेल्या पाच वर्षात सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या त्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल झाले, त्यांचे जीवनमान उंचावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृरदृष्टीमुळे देश सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्राला देशात नंबरवन बनविले आहे. त्यामुळे लोकसभेला पुन्हा लोकांनी भाजप-सेनेला पुन्हा निवडून दिले आहे. आताही विधानसभेत भाजप-सेनेचीच सत्ता येणार आहे. नगरमध्येही भाजप-सेना महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करुन शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत, त्यामुळे आमचा विजय पक्का आहे, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी केले.

महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ मार्केट यार्डमध्ये प्रचारफेरी काढून हमाल-व्यापार्‍यांना आवाहन करण्यात आले. याप्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, परेश लोखंडे, विवेक नाईक, दत्ता कावरे, शांतीलाल गुगळे, अजय बोरा, समीर बोरा, नितीन चंगेडिया, ऋषभ भंडारी आदि उपस्थित होते.

दिलीप गांधी पुढे म्हणाले, आपण खासदार म्हणून नगरच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे शहराला विकासाच्या पथावर नेऊन ठेवले आहे. आता आपल्या शहराला महानगरचा लुक देण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी भाजप-सेना युतीचे उमेदवार अनिल राठोड विधानसभेत जाणे आवश्यक आहे. भाजप-सेनेचे सरकारच नगरचा विकास करु शकते. त्यामुळे मतदारांनी मोठ्या मताधिक्याने अनिल राठोड यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी, हमाल, मापाडी, कष्टकरी वर्ग यांच्या भेटी-गाठी घेऊन चर्चा केली. या प्रचारफेरीस उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post