आ. संग्राम जगताप यांना पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा



माय नगर वेब टीम
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असता महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेल्या पँथर्स रिपब्लिकन पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष एन.एम. पवळे यांनी दिली. तर जिल्ह्यातील सर्व पँथर रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महाआघाडीचे काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बहादूर शेख यांनी केले आहे.
नुकतीच मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. सदर बैठकित हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील भाजप-शिवसेना युतीची सत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये पायउतार करणे आवश्यक आहे. राज्यामध्ये सध्यास्थितीत बेरोजगारी झपाट्याने वाढली आहे. शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची भरीव मदत देण्यात आलेली नाही. दिवसेंदिवस शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना महागाईमुळे जगणे कठिण बनले असून, त्यांच्या संरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अनेक मागासवर्गीय मुला-मुलींना शैक्षणिक लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मागासवर्गीयांचे व शेतकर्‍यांची मुले बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहे. या ज्वलंत प्रश्‍नाबाबत सत्ताधार्‍यांना काही देणेघेणे वाटत नाही.
सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत असून, सत्ता मिळविण्यासाठी इतर पक्षातून आयात केलेले उमेदवार लादण्यात आल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष एन.एम. पवळे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदी, शेतकरी आत्महत्या, जीएसटी, महिलांवरील अत्याचार हे प्रश्‍न सोडविण्यास सरकार असमर्थ ठरले असून, अच्छे दिनाच्या प्रतिक्षेत वाईट दिवस आले आहे. दळभद्री सत्ता उलथून लावण्यासाठी पँथर्स रिपब्लिकन पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीला पाठिंबा जाहिर केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post