...अखेर राठोड-गांधींचे मनोमिलन ; महायुतीत जल्लोष
माय नगर वेब टीम
अहमदनगर - लोकसभा, विधानसभेला एकमेकांना कडाडून विरोध करणारे भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी व शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यामध्ये आज (बुधवारी) मनोमिलन झाले. आमचे युतीमधील पेल्यातील वादळ होते असे यावेळी दोन्ही नेत्यांनी स्पष्ट करत करत राज्यात महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी शिवसेना - भाजपाचे कार्यकर्ते काम करत असून नगरमध्ये पुन्हा भगवा फडकवायचा आहे. आम्ही एकत्र आल्यामुळे आता नगर शहरात भगवा फडकणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे माजी खा.गांधी व उपनेते राठोड यांनी स्पष्ट केले. गांधी राठोड यांच्या प्रचार फेरीत सहभागी होत युतीचा धर्म पाळा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
विधानसभा मतदानाची वेळ आली तरी दिलीप गांधी राठोड यांच्या प्रचारापासून अलिप्त होते. अखेर गांधी - राठोड यांचे मनोमिलन झाले असून नगर शहर मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप युतीचा विजय असो, अशा जोरदार घोषणाबाजी भाजप कार्यालयात झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये देण्यात आल्या. या बैठकीला शहर प्रमुख दिलीप सातपुते , नगरसेवक अमोल येवले, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, राजेंद्र राठोड, भाजपाचे किशोर डागवाले, सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, दत्ता जाधव, श्याम नळकांडे, हरिभाऊ डोळसे, प्रशांत पाथरकर, संभाजी कदम, आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात शिवसेना महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड, माजी खासदार दिलीप गांधी यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकच जल्लोष केला. यावेळी भाजप कार्यालया समोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, केंद्रात राज्यात शिवसेना लहान भाऊ आहे. भाजप मोठा भाऊ आहे . मात्र नगरमध्ये शिवसेना मोठा भाऊ आहे, मात्र आता कोणी लहान - नाही व कोणीही मोठे नाही आपल्याला आता एक दिलाने काम करायचे आहे असे ते म्हणाले.
उमेदवार अनिल राठोड म्हणाले की, मी भगवा झेंडा कधी खाली ठेवला नाही, निष्ठेने काम करत आहे. भाजप शिवसेनेने एक दिलाने काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही मीच काय कोणीही निवडून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणुकीला आता चार दिवस राहिले आहेत, पण तुम्ही एकत्र असल्यामुळे चार तासांमध्ये चार दिवसाचे काम करू शकतात हा आम्हाला विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागांमध्ये मतदान घडवून आणण्यासाठी व महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घ्यावे. पाच वर्षांमध्ये नगरची प्रतिमा धुळीला मिळाली, आता आपल्याला पुन्हा सत्ता आणायची आहे. केडगाव हत्याकांडामुळे नगरची बदनामी झाली असल्याचे ते म्हणले.
Post a Comment