....त्यावर पुन्हा चर्चा नको - संपत बारस्कर



माय नगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नगरमधील मेळाव्यानंतर पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद हा किरकोळ कारणातून झालेला पक्षांतर्गत वाद आहे. गैरसमजूतीतून हा वाद झाला आहे. या घटनेत सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. कार्यकर्त्यांचा वाद हा घरातील वाद आहे. या वादाशी आ. संग्राम जगताप यांचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट करत हा वाद ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेतून मिटविला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते संपत बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला हा वाद पक्षाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर आणि आ. संग्राम जगताप यांनी चर्चा करुन मिटविला आहे. विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष ते गटनेते पदापर्यंत काम करण्याची संधी आ. संग्राम जगताप आणि दादाभाऊ कळमकर यांच्यामुळे मला मिळाली आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते आणि मी आतापर्यंत कळमकर यांच्याबरोबर काम करत आलो असल्याचे सांगत बारस्कर म्हणाले की, या वादात कोणी व्यक्तिगत फायद्यासाठी पक्षाचे किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव खराब करू नये. असेही त्यांनी म्हटले आहे.

आ. संग्राम जगताप यांनी मागील पाच वर्षापासून विकासकामे आणि मोठा लोकसंपर्क ठेवल्याने त्यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यांच्या कामातून व कष्टातून त्यांना ही लोकप्रियता मिळाली आहे. दादाभाऊ कळमकर यांनी घडलेली घटना मिटविली आहे. त्यामुळे या वादाच्या घटनेवर पुन्हा कोणी चर्चा करू नये असे आवाहन करत बारस्कर म्हणाले की पाच वर्षे विकासाच्या मुद्यावर आम्ही जनतेसमोर गेलो आहोत. शहराची विकासाकडे वाटचाल व तरुणांच्या हाताला रोजगार यावर आम्ही करत आहोत. या वादाचा फायदा घेऊन कोणीही दिशाभूल करण्याचे प्रयत्न करू नये.असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post