विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला.
सात्वंनपर भावना व्यक्त करतांना सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब , कष्टकऱ्यांच्या पाठिशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार , प्रेम व स्नेह होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व" होते. त्यांचा पिंड समाजकारण व राजकारणाचा होता. ते नेहमीच लोकांमध्ये वावरले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून त्यांना सावरण्याचे बळ मिळो, ही प्रभू चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात जिल्हावासिय सहभागी आहेत.
यावेळी त्यांच्या पार्थिवाचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे,आमदार अमोल खताळ,आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी जंगले महाराज, आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या अंत्यसंस्कारास राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. जुलै २००२ ते जुलै २००४ या काळात ते मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे राज्यमंत्री होते, तर जुलै २००४ ते ऑक्टोबर २००४ या काळात त्यांनी जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप, पुनर्वसन आणि मदतकार्य या विभागांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. २००४ मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तसेच, त्यांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले असून २००७ पासून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि २००८-०९ तसेच मार्च २०२३ पासून चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केले. राज्य शासकीय समित्यांमध्ये त्यांनी रोहयो, पंचायतराज व सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायत बु-हाणनगरच्या सरपंचपदापासून झाली, जिथे ते १९८४ ते १९९६ या काळात कार्यरत होते.
*तळमळीने काम करणारा लोकसेवक हरपला*
*- उपमुख्यमंत्री अजित पवार*
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
*जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली*
ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदार संघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कर्डीले यांच्या निधनाने कर्डीले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
Post a Comment