एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू देणार नाही ; काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्तांची ग्वाही



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या बोल्हेगाव फाटा येथील शैक्षणिक संकुलात गुरुवारी ( दि.१७ एप्रिल) जागेबाबत सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे करण्यात आलेल्या कारवाईच्या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि स्टाफमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेदरम्यान कॅम्पसमध्ये गोंधळ निर्माण होवून चुकीच्या अफवा पसरल्या गेल्या. विशेषत: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र व्यवस्थापन याबाबत सकारात्मक दृष्टीने मार्ग काढत असून एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू दिले जाणार नसल्याची ग्वाही काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ.दिप्ती म्हस्के - ठाकरे यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत आणि सुरळीतपणे पार पडल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक शनिवारी (दि.१९) नगरमध्ये पार पडली. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्किटेक्ट समीर ठाकरे, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल काॅलेजचे प्राचार्य डॉ.विवेक रेगे, उपप्राचार्या डॉ.पुनम गायकवाड, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संदीप बडधे, पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अजित चवरदार, प्रा.डाॅ.निलिमा भोज, प्रा.नितीन ठुबे यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.म्हस्के-ठाकरे पुढे म्हणाल्या की, महाविद्यालयाच्या आवारात घडलेल्या घटनेबाबत तातडीने संबंधित विद्यापीठांना कल्पना दिली गेली असून त्यांनी परिस्थिती समजून घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या दृष्टीने सहकार्याची भावना दर्शविली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आगामी परिक्षांबाबत पर्यायी परिक्षा केंद्र विद्यापीठांनी उपलब्ध करुन दिल्याने परिक्षा व्यवस्थितपणे व ठरलेल्या वेळेत पार पडणार आहेत. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत लवकरच सकारात्मक मार्ग काढुन विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने योग्य ती तरतूद विश्वस्त आणि प्रशासन करीत आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत काळजी करु नये आम्ही सक्षमपणे आणि समर्थपणे परिस्थिती हाताळत आहोत. वास्तविक, दोन दिवसांनंतर आम्ही आमची भुमिका मांडली याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मात्र फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या परिक्षांच्या दृष्टीने पर्यायी केंद्र उपलब्ध करुन प्राधान्याने यातून मार्ग काढण्यात आम्ही व्यस्त होतो असे त्या म्हणाल्या. या संकटकाळात विद्यार्थी, पालक आणि स्टाफने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी होमिओपॅथी मेडिकल काॅलेजचे प्राचार्य डॉ.रेगे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या आड कोणतीही गोष्ट येणार नाही याची व्यवस्थापन आणि स्टाफ काळजी घेत असून विद्यापीठाच्या परिक्षा मे आणि जूनमध्ये पार पडणार असून

आपल्या विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्र हे दरवर्षी दुसऱ्या काॅलेजमध्ये असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांना काही शैक्षणिकदृष्ट्या शंका असतील तर आपापल्या विषयाच्या शिक्षकांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.बडधे म्हणाले की, डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांची सोमवारपासून ( दि.२१ एप्रिल) प्रॅक्टिकल परीक्षा सुरु होणार असून त्यासाठी विद्यापीठाने पर्यायी परिक्षा केंद्र उपलब्ध करून दिले असून त्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच मे महिन्यात होणाऱ्या लेखी परीक्षांबाबतही विद्यापीठ सकारात्मक दृष्टीने सहकार्य करणार असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन डॉ.बडधे यांनी केले आहे.

नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.चवरदार म्हणाले की, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची सध्या कोणतीही परीक्षा नाही, तोपर्यंत व्यवस्थापन निर्माण झालेल्या समस्येवर निश्चितपणे मार्ग काढेल. विद्यार्थ्यांचे लेक्चर हे थोड्या कालावधीसाठी ऑनलाईन माध्यमातून होणार असल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होवू दिले जाणार नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी चिंता न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

सीईओ ठाकरेंच्या भाषणावेळी कर्मचारी गहिवरले 

महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर संस्थेचे सीईओ समीर ठाकरे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक घेत मनमोकळेपणाने प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी आणि स्टाफला काॅलेज कॅम्पस खाली करताना अश्रू अनावर झाल्याचे सांगत पुढे काय आणि कसे होणार हा प्रश्न तर मनात आहेच, मात्र या संस्थेशी कौटुंबिक नातं तयार झालं असल्याचे म्हणाले. यावेळी सीईओ ठाकरे यांनी विद्यार्थी आणि स्टाफवर कोणताही अन्याय होवू दिला जाणार नसल्याचे सांगत एकाही कर्मचाऱ्याचे काम बंद होणार नाही. तसेच त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होवू दिले जाणार नाही याची ग्वाही दिली. वाद हा जागेबाबत असून काॅलेज किंवा संस्थेबाबत नसल्याचे स्पष्ट करत विश्वस्त डॉ.अभितेज म्हस्के आणि विश्वस्त, प्रशासन आम्ही तज्ञांचे मार्गदर्शन घेत तोडगा काढत आहोत. या कठीण काळातही सर्वांनी एकजूट दाखवून पाठबळ दिल्याने सर्वांचे आभार व्यक्त केले. आपले कुटुंब एकसंध राहणार असून लवकरच या परिस्थितीतून सर्वांच्या सहकार्याने मार्ग काढणार असल्याचे सीईओ ठाकरे यांनी सांगितले. यावेळी अनेक कर्मचारी गहिवरल्याचे पहावयास मिळाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post