संघर्षातून मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे भारत देश मजबूत- अश्विनी बोरा यशश्री अकॅडमी मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ; विविध कार्यक्रम संपन्न

 माय अहमदनगर वेब टीम



नगर तालुका-  भारत देशाला स्वातंत्र्यासाठी सुमारे दोनशे वर्ष संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी  अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मोठ्या संघर्षातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे भारत मजबूत स्थितीत असून आपल्या देशाकडे कोणी वाईट नजरेने पाहण्याची हिंमत करत नाही, असे प्रतिपादन सौ. अश्विनी बोरा यांनी केले आहे.



        नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमी मध्ये स्वतंत्रता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. आश्विनी बोरा व नितीन बोरा हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अश्विनी बोरा यांनी सांगितले की, भारतावर ब्रिटिशांनी राज्य केले. स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती  देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. ते स्वातंत्र्य टिकवून ठेवणे  ही आता आपली जबाबदारी आहे. संघर्षातून मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आज भारत देश मजबूत स्थितीत असून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सौ. अश्विनी बोरा यांनी सांगितले.



         यशश्री अकॅडमी मध्ये चिमुकल्यांनी एकता आणि विविधता या विषयावर नृत्यविष्कार सादर केला. मार्चपास व लाठीकाठी हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. चिमुकल्यांनी विविध गाण्यावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्यदिनानिमित्त सांघिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते  झेंडावंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.



        यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनुरीता शर्मा, सचिव गणेश शर्मा, मुख्याध्यापक सिरिल पंडित, उपमुख्याध्यापिका आरुषा कोल्हटकर, प्रज्ञा जोशी, क्रीडा मार्गदर्शक राजू पवार,  धुप्पड मॅडम, जेऊर प्री स्कूल मुख्याध्यापिका सौ. मनीषा पवार,  सावेडी प्री स्कूलच्या मुख्याध्यापिका तानिया वाधवाणी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post