सरपंचांची निवड जनतेतुन होणे गरजेचे -पै. नाना डोंगरे सरपंच परिषद आक्रमक ; ११ जुलै रोजी लक्षवेधी आंदोलन

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- ग्रामपंचायत मध्ये सरपंच थेट जनतेमधून निवडून देण्याचा क्रांतीकारक निर्णय पुन्हा महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरपंच परिषदेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती सरपंच परिषदेचे नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे यांनी दिली.

       नगर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि.११ जुलै रोजी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व पदाधिकारी व सदस्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

       महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या सत्ता काळात जनतेमधून सरपंच निवडीचा घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. सध्या महाराष्ट्रात नवीन सरकार आले असून, या सरकारकडून सरपंच थेट जनतेतून निवडावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी सरपंच परिषदेने पुढाकार घेतला असून, जनतेमधून सरपंच निवडला गेल्यास घोडे बाजार थांबून ख-या अर्थाने ग्रामीण भागाला न्याय मिळणार असल्याची भूमिका सरपंच परिषदेने घेतली असल्याचे डोंगरे यांनी म्हंटले आहे.

         यावेळी नांदगाव सरपंच सुनिता सरक, निंबोडी सरपंच शंकर बेरड, पिंपरी सरपंच रभाजी सुळ, पोखर्डी सरपंच रामेश्वर निमसे, माजी उपसरपंच महेंद्र शेळके, आगडगाव सरपंच मच्छिंद्र कराळे, इसळक सरपंच छाया गेरंगे, कापूरवाडी सरपंच संभाजी भगत, खडकी सरपंच प्रविण कोठुळे, बहिरवाडी सरपंच अंजना येवले, बुरुडगाव सरपंच अर्चना कुलट, भोयरे पठार सरपंच बाबा टकले, इमामपूर सरपंच भिमराज मोकाटे, रुईछत्तीसी सरपंच विलास लोखंडे, वाळकी सरपंच स्वाती बोठे, वडगाव सरपंच विजय शेवाळे, जेऊर सरपंच राजश्री मगर, नगर तालुका महिला अध्यक्षा अनुजा काटे यांच्यासह पदाधिकारी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

_________________________________


११ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर तहसील कार्यालयांना निवेदन देऊन थेट जनतेतून सरपंच निवडण्याची मागणी करण्यात येणार आहे. तालुका पातळीवरील पदाधिकारी हे तालुक्यातील तहसीलदारांना तर जिल्हा पातळीवरील पदाधिकारी हे जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहेत. सरपंचांची निवड ही थेट जनतेतून होणे गरजेचे असून त्यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

.....पै. नाना डोंगरे ( सचिव, नगर तालुका सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य, मुंबई )

________________________________________

 गाव विकासासाठी निर्णय महत्त्वाचा सदस्यातून सरपंच निवडीवेळी सदस्य फोडाफोडी, पळवा पळवी, वादविवाद होत असतात. त्याचा परिणाम संपूर्ण पाच वर्ष विरोधाला विरोध म्हणून प्रत्येक विकास कामात गट तट पडतात. यामुळे गाव विकासाला खीळ बसत असते. त्यामुळे गाव विकासासाठी सरपंचांची थेट जनतेतून निवड होणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातील हे चित्र बदलण्यासाठी जनतेतुन सरपंच निवडीचा निर्णय घेण्यात यावा. 

.......सौ. प्रियंका अजय लामखडे ( महिला जिल्हा उपाध्यक्ष, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र)

_______________________________________


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post