जनतेतून सरपंच निवडीसाठी सरपंच परिषद आक्रमक ११ जुलै रोजी लक्षवेधी आंदोलन ; जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे


 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- सरपंचांची निवड ही थेट जनतेतूनच केली जावी या मागणीसाठी सरपंचांचे संघटन असलेली सरपंच परिषद पुन्हा आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच परिषदेने ११ जुलै रोजी राज्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयाला मागणीचे निवेदन देऊन राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी दिली.

        राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यामुळे मागील वेळी युतीची सत्ता असताना थेट जनतेतून सरपंच हा क्रांतिकारी निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. महाविकास आघाडीच्या काळात हा आदेश रद्द करण्यात आला. तात्कालीन ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी युती सरकारच्या काळात ग्राम विकासामध्ये काम करणाऱ्या घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून थेट जनतेतून सरपंच निवडीचा कायदा केला होता त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून न्याय मिळाला होता.

     आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द करून सरपंचाची निवड सदस्यांमधून ठेवली. त्यावेळी संपूर्ण राज्यभर सरपंच परिषदेने या निर्णयाविरुद्ध तीव्र निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला होता. आता राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले आहे त्यामुळे सरपंच निवडी वेळी होणारा घोडेबाजार, भांडण, वाद विवाद टाळण्यासाठी थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घ्यावा. यासाठी सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे सरपंच परिषदेचे नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.

_______________________________________________

११ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर तहसील कार्यालयांना निवेदन देऊन थेट जनतेतून सरपंच निवडण्याची मागणी करण्यात येणार आहे. तालुका पातळीवरील पदाधिकारी हे तालुक्यातील तहसीलदारांना तर जिल्हा पातळीवरील पदाधिकारी हे जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहेत. सरपंचांची निवड ही थेट जनतेतून होणे गरजेचे असून त्यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

.... आबासाहेब सोनवणे ( जिल्हाध्यक्ष अहमदनगर)

________________________________

जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविणार 

थेट जनतेतून सरपंच निवडीच्या विधायकासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहोत. त्यांनी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. तरी राज्यातील सर्व सरपंचाच्या थेट जनतेतून सरपंच निवडीच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ११ जुलै रोजी लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून सरपंच परिषद संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे.

...... दत्ता काकडे (प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र)

__________________________________


 गाव विकासासाठी निर्णय महत्त्वाचा

 सदस्यातून सरपंच निवडीवेळी सदस्य फोडाफोडी, पळवा पळवी, वादविवाद होत असतात. त्याचा परिणाम संपूर्ण पाच वर्ष विरोधाला विरोध म्हणून प्रत्येक विकास कामात गट तट पडतात. यामुळे गाव विकासाला खीळ बसत असते. त्यामुळे गाव विकासासाठी सरपंचांची थेट जनतेतून निवड होणे गरजेचे आहे.

.......सौ. प्रियंका लामखडे ( महिला जिल्हा उपाध्यक्ष, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र)

_______________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post