विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा

माय वेब टीम

 मुंबई - जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशनाला (monsoon session) सुरुवात होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास सांगितले आहे. (Maharashtra Legislative Assembly)

त्यामुळे मागील अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या पत्रात विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल आठवण करून दिली. राज्यपालांच्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्द्यावर बरीच चर्चा रंगू लागली आहे.

विधानपरिषदेचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलैला होणार आहे. मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडले होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून (Congress) मोठ्या हालचाली सुरु झाल्याचे समजते.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा विचार सुरु असल्याचे समजते.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे राज्यातील दलित मतदारांना वळवण्याची सूचना केली होती. त्यानंतर नितीन राऊत यांचे नाव अध्यपदाच्या शर्यतीत आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याव्यतिरिक्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचंही नाव चर्चेत आहे तसेच प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसंच काँग्रेसमधून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमिन पटेल यांच्या नावाचीही चर्चा आहे.

विधानसभा अध्यक्ष निवड विधिमंडळ अधिवेशनात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलैला होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. तसंच काँग्रेस पक्षात कोणतीही अंतर्गत नाराजी नसून मी मंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडत असल्याचं सांगत माझ्यावर कोणताही मंत्री नाराज नसल्याचं नाना पटोले यांनी सांगितले आहे.

तसंच महाविकास आघाडीतही कोणतेही अंतर्गत वाद नसून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी अधिवेशन आणि इतर विषयांवर चर्चा केली. या अधिवेशनात आम्ही केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधाक नवे धोरण मांडणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितले आहे.

दरम्यान, 23 जून ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काही मागण्या केल्या. यानंतर 24 जूनलामुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असून पद रिक्त हा मुद्दा मांडण्यात आला. राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post