मंदिरं बंद करण्याचा आदेश मोदींनीच दिला होता; राष्ट्रवादीचा पलटवार



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - राज्यातील धार्मिक स्थळे आज पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर त्यावरून श्रेय घेण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. भाजपने काही ठिकाणी आज आनंदोत्सव साजरा केला. यावरून मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. 'भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतय,' असं पाटील यांनी नगरमध्ये बोलताना स्पष्ट केले. तसेच मंदिर उघडण्याचे श्रेय भाजपला जाऊच शकत नाही. तर हे श्रेय मुख्यमंत्री व राज्य सरकारचे आहे,' असेही ते म्हणाले.

'लॉकडाऊनच्या काळात मंदिर बंद करण्याबाबत नरेंद्र मोदी  यांनी आदेश दिला होता,' असे सांगत पाटील पुढे म्हणाले, 'देशामध्ये आजही करोना अस्तित्वात आहे. राज्यातही बऱ्याच ठिकाणी अनेक रुग्ण आहेत. हे रुग्ण कमी कसे करायचे, यासाठी आमचे सरकार सतत प्रयत्न करीत होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट हळूहळू उघडायची आणि करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू द्यायची नाही, असा आमचा प्रयत्न होता. रेल्वे चालू झाल्या, बाकीचे व्यवस्था चालू झाल्या, आता शेवटच्या टप्प्यात प्रार्थनास्थळे चालू करण्याचा निर्णय घेतला. पण भाजपला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असते. भाजपने काही महिन्यापूर्वीच मंदिराच्या बाहेर जाऊन थाळीवादन केले. करोना राहिला बाजूला. करोना रुग्ण कमी कसे होतील त्यासाठी भाजपची मदत, सूचना, सहकार्य असते तर मी समजू शकलो असतो. उलट करोना रुग्ण कसे वाढणार नाही, हे प्रयत्न सगळ्यांनी करायचे असतात. जसे आम्ही केंद्रात विरोधी पक्षात असताना देखील नरेंद्र मोदी यांचे जे म्हणणे असेल ते आम्ही ऐकून घेतले. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने राजकारण करायचे नाही, ही आमची भूमिका होती. कारण करोना संकट जगावर आले होते. मात्र दुसरीकडे भाजपने प्रत्येक गोष्टीत राजकारण करते,' असेही ते म्हणाले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post