अतिवृष्टीचा धोका टळलेला नाही; लष्करासह सर्व यंत्रणा हाय अॅलर्टवर




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात परतीच्या पावसाचा कहर सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला आहे. पावसाचे संकट अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये, यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ( एनडीआरफ ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. तसेच वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अॅलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 

अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. पंढरपुरातील कुंभार घाट येथे अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात सर्वदूर अशी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफुटीतून निर्माण होणारी अतिवृष्टीची परिस्थिती यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्हयात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्हयातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्वच परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरे आज सकाळपासूनच आढावा घेत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post