सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकारला अपयश



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – भारत-चीन सीमेवर जे घडत आहे त्यातून आपले परराष्ट्रीय धोरण चुकले आहे. आजपर्यंत चीनला आपण रोखले होते मात्र आज ती स्थिती राहिली नसून सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार कमी पडले असे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
चीनबाबतचं कूचकामी धोरण आणि करोना संकट काळातही देशभरात वाढत चाललेल्या इंधन दरवाढीवरून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सहकार्‍यांसह शांततेत आंदोलन केले. राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून शहिदों को सलाम दिवस पाळण्यात आला. यावेळी थोरात यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आ. अमिन पटेल, आ. झिशान सिद्दीकी, चरणजितसिंग सप्रा, मधु चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत हे उपस्थित होते.

गांधी भवन येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी चव्हाण यांनी चीनच्या घुसखोरीवरुन मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी ही चिंतेची बाब आहे. देशहिताचा विचार करत सरकार देशाच्या संरक्षणासाठी जो निर्णय घेईल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे परंतु चीनने भारताच्या भूमीवर घुसखोरी केलीच नाही हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य चीनला पोषक ठरले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा परिणाम झाला आहे.

चीनने मोदींच्या वक्तव्याचा पुरेपुर फायदा उठवत घुसखोरी केली नाही असे तो जगभर सांगत सुटला आहे. पंतप्रधानांचे हे वक्तव्य काँग्रेसला मान्य नाही. पंतप्रधान कार्यालयाने त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला परंतु ते पुरेसे नसून सरकारने पंतप्रधानांच्या त्या विधानावर खुलासा करावा. एवढ्या मोठ्या व अत्यंत गंभीर प्रश्नावर बोलताना पंतप्रधानांनी अत्यंत जबाबदारीने व गांभीर्याने बोलणे अपेक्षित आहे, पण तसे झाले नाही. सरकारला प्रश्न विचारणे विरोधकांचे काम आहे आणि त्याला उत्तर देणे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग हे सहा वर्षात 19 वेळा भेटले त्याचा भारताला काहीच फायदा झालेला नाही. यावेळी चव्हाण यांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. एप्रिल, मे 2020 मध्ये चीनने भारताच्या हद्दीत कितीवेळा आक्रमण केले ? पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत मते वादग्रस्त विधान का केले ? पंतप्रधानांच्या विधानामुळे वाटाघाटीत भारताची भूमिका कमकुवत पडली का ? सीमेवरील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारत सरकारने काय उपाय केले? या प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने द्यावीत, असे चव्हाण म्हणाले.

चीनने सीमा भागातील आपल्या कुरापती थांबवलेल्या नाहीत.सॅटेलाईटच्या माध्यमातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या असून गलवान भागातून चीन परत गेलेला नाही. उलट त्या भागात चीनी सैन्यांच्या चौक्या आहेत, लष्करी वाहनांची ये जा सुरु आहे. जवळपास 10 हजार सैनिक त्या भागात तैनात आहेत, मोठा तोफगोळाही आहे. चीनकडून गलवान नदीपात्रात बांधकामही सुरु आहे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post