एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत

माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे योगदान आहे त्यामुळे प्रत्येक गिरणी कामगारास घर कसे मिळेल ते आम्ही पाहुत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबई बाहेर जाऊ नका असे आवाहनही त्यांनी केले.

म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर , म्हाडाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर ,सभापती म्हाडा विनोद घोसाळकर ,झोपडपट्टी पुनर्वसनचे सभापती विजय नाहटा, सचिन अहिर उपस्थित होते.

मी आज भाषण न करता कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे अशी भावनिक सुरुवात करून मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांचे ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे असे सांगितले.

घर लागल्यावर मला आपल्या घरी चहा प्यायला बोलवा ,आपल्या घरात आनंदी राहा,घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका.असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई पालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यामधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे असे यावेळी बोलतांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्याअनुषंगाने मुंबई मंडळातर्फे वडाळा येथील बॉम्बे डाइंग मिल गृहप्रकल्पांतर्गत 720 सदनिका बांधण्यात आल्या आहेत. स्प्रिंग मिल येथेही 2630 सदनिका आणि लोअर परेल येथिल श्रीनिवास मिलच्या जागी 544 सदनिका बांधण्यात आल्या आहेत.या सदनिका मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पातील 225 चौ.फुटाच्या वन बीएचके स्वरुपातील सदनिका अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत.तसेच आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईग मिल गृह प्रकल्पाच्या आवारात 15 मजल्याचे वाहनतळ इमारत (पार्किग टॅावर) उभारण्यात आले आहे.याकरिता एकूण 1 लाख 74 हजार 36 अर्ज गिरणी कामगार व त्याच्या वारसांकडून प्राप्त झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post