अहमदनगरमध्ये बाधित तीनही रुग्णांची तब्बेत स्थिर; आतापर्यंत २११ व्यक्तींचे नमुने निगेटीव्ह


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - आतापर्यंत जिल्ह्यातील 346 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 25 व्यक्तींना आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान एनआयव्हीकडे 236 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील दोनशे अकरा जणांचे स्त्राव नमुने निगेटिव आल्याने त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बाधित तीनही रुग्णांची तब्येत स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. दिवेदी यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आणि आरोग्य विभागाच्या डॉक्टरांशी चर्चा करून या बाबींचा आढावा घेतला तसेच यापुढील काळात अधिकाधिक सतर्क राहून काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणी साठी येणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील तर त्याचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. अशा 79 जणांना आजअखेर देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

दरम्यान शहरात आढळलेल्या कोरोना बाधित पहिल्या रुग्णास उद्या चौदा दिवस पूर्ण होत आहेत.त्याचा स्त्राव नमुना उद्या एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वताच्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post