आठ हजार पोलिस अन् ७ हजार कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - राज्यात लवकरच पोलिस भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. हिंगणघाट येथील फुलराणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ‘दिशा’ कायदा करण्याचा सरकार गंभीरपणे विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
गृृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देशमुख प्रथमच पुणे दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयास भेट दिली. ते म्हणाले, राज्यात मागील पाच वर्षात पोलिस भरती झाली नसून आमचे सरकार आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने सात हजार सुरक्षा रक्षकांची भरती मार्च २०२० मध्ये राबवण्यात येणार आहे. मुंबई आणि नागपूर येथे संभावित भरती करण्यात येणार असून १२ वी पास आणि १८ ते २८ वयोमर्यादा यासाठी राहणार आहे. भरती प्रक्रियेतून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. नंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्त्वावर सामावून घेण्यात येईल. खासगी कंपनी, हॉस्पिटल, सार्वजनिक महामंडळे या ठिकाणी त्यांच्या नेमणुका केल्या जातील.
Post a Comment