१५ दिवसांपूर्वी केला विनयभंग; नंतर पळवून नेऊन अत्याचार



माय अहमदनगर वेब टीम
जालना/परतूर -परतूर शहरातील एका १५ वर्षीय मुलीला पळूवन नेणाऱ्या युवकास पोलिसांनी हैदराबादेतून शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नसीर काजी असे आरोपीचे नाव असून ३१ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता त्याने पीडितेस पळवून नेले होते. तत्पूर्वी १६ जानेवारी रोजी त्याने विनयभंग केला होता. मात्र बदनामी होऊ नये म्हणून कुटुंबीयांनी तक्रार देण्याचे टाळले होते. याचाच फायदा घेऊन आरोपीने मुलीस पळवून नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले आहे.

परतूर शहरातील घरकाम करणाऱ्या पीडितेच्या आईने याबाबत परतूर पोलिस ठाण्यात ३१ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. १६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता त्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान, सायंकाळी आल्यावर त्यांना मुलगी घरी दिसली नाही म्हणून त्यांनी कुटुंबीयांसह मुलीचा शोध घेतला. त्याचवेळी आरोपी नसीर काजी हा तिच्यासोबत गैरवर्तन करताना दिसून आला. या वेळी त्याला पकडून चोप दिला. मात्र, जातीवाचक बोलून तुम मेरा क्या बिघाडोगे, मै तो इसको छोडूंगा नही असे म्हणून तो पळून गेला. केवळ समाजात बदनामी होईल म्हणून त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही. त्यानंतरही नसीर घरासमोरून ये-जा करत मुलीकडे बघून इशारेबाजी करायचा. ३१ जानेवारीच्या पहाटे २ वाजेदरम्यान मुलगी लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्यावर परत आलीच नाही. या वेळी तिचा शोध घेतला असता, नसीर काजी हा मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेताना दिसून अाला. दरम्यान, मुलगी लहान असून हे कुटुंब मागासवर्गीय आहे, हे माहिती असतानासुद्धा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मुलीला पळवून नेले असे तक्रारीत म्हटले होते. यानुसार गुन्हा दाखल करून परतूर पोलिसांनी शोध सुरू केला. यातील आरोपी नसीर काजी हा मुलीला घेऊन हैदराबादला पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीस हैदराबादेत जाऊन मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन शुक्रवारी पहाटे ५ वाजता परतूरला आणले. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सोपान बांगर हे करीत आहेत.

एसपींकडे आरोपीच्या अटकेची मागणी

या प्रकरणात आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने थेट पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देऊन मुलीचा शोध घेऊन न्याय देण्याची मागणी ७ फेब्रुवारी रोजी केली होती. गुन्हा नोंद झाल्यावर दोन दिवसात शोध घेऊ असे आश्वासन परतूर पोलिसांनी दिले होते तरीसुद्धा आरोपीस अटक झाली नव्हती, यामुळे हे निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. यामुळे तपासचक्रे फिरवत पोलिसांनी आरोपीस हैदराबादेतून अटक केली.

पीडितेची सुधारगृहात रवानगी

यातील पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला बाल न्यायालयाच्या आदेशावरून शुक्रवारी रात्री ११ वाजता सुधारगृहात पाठवण्यात आले. तसेच शनिवारी पुन्हा तपासकामी पीडितेस परतूर येथे आणण्यात आले होते, त्यानंतर पुन्हा जालना येथील सुधारगृहात ठेवण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी डीवायएसपी सोपान बांगर यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post