
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशातील वाढत्या महागाईवरुन काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपला ना वाढत्या महागाईबाबत चिंता आहे ना सर्वसामान्य लोकांची चिंता आहे, असे काँग्रेसचे माध्यम समन्वयक रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे. महागाईवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बाेलावण्याची मागणीही सुरजेवाला यांनी केली आहे.
रणदीपसिंग सुरजेवाला यांनी किरकोळ महागाईच्या आकड्यांचा उल्लेख करत पत्रकार परिषदेत सांगितले की, नोव्हेंबर २०१३ च्या तुलनेत खाद्यपदार्थांची महागाई उच्च पातळीवर पोहोचली आहे. भाज्यांचे दर ६० टक्के, डाळींचे १५.५ टक्के, खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांचे १२.५ टक्के तर मसाल्याचे दर सहा टक्के वाढल्याचा दावा करत सुरजेवाला यांनी सांगितले की, आता शाकाहारी होणेही गुन्हा झाला आहे. नंतर एक ट्विट करत सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांचा उल्लेख केला आहे.
महागाईवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी करत सुरजेवाला यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी देशासमोर स्पष्ट करावे की, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाय केले जाणार आहेत. पंतप्रधान फूट पाडण्याच्या कामात लागले असून देशासमोरील महत्त्वाच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष नसल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला. आकड्यानुसार सोमवारी महागाई दर पाच वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे ७.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सोमवारी विरोधकांनी एक प्रस्ताव मंजूर करत भारत सरकारच्या अर्थव्यवस्थेतील कुव्यवस्थापनामुळे उपजीविका कठीण झाली आहे. आर्थिक संकटामुळे अर्थव्यवस्थेला देशाच्या जीडीपीतील घट झाल्याने मंदीकडे नेले आहे. बेरोजगारी गेल्या अर्धशतकातील सर्वाेच्च पातळीवर पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसोबतच कृषी संकट वाढत चालले आहे. औद्योगिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात होत आहे. इंधन, स्वयंपाकाचा गॅस, भाज्या तसेच सर्वच आवश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांचे आयुष्य कठीण झाल्याचे त्यात म्हटले आहे.
भाजपने गरिबांच्या पोटावर लाथ मारली : प्रियंका
वाढत्या महागाईच्या मुद्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गरिबांच्या पोटावर लाथ मारली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रियकां गांधी यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, भाजीपाला, अन्नपदार्थांचे दर सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर झाले आहेत. भाजीपाला, तेल, डाळ आणि गहू महाग झाल्यास गरिबांनी काय खावे? शिवाय आर्थिक मंदीमुळे गरिबांना कामही मिळत नाही. यामुळेच भाजपने गरिबांच्या पोटावर लाथ मारली असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी ट्विटसह महागाईची आकडेवारी दर्शवणारे एक छायाचित्र शेअर केले आहे.
Post a Comment