अहमदनगरमध्ये मोबाईल विक्रेत्यांची निदर्शने ; जेफ बेझोस गो बॅकच्या घोषणा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: एफडीआय पॉलिसी नुसार ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या विदेशी कंपन्यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन सेवेमुळे देशभरातील हजारो मोबाईल विक्रेत्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत असून देशभरातील असंख्य व्यापारी देशोधडीला लागले आहेत.विद्यमान मोदी सरकारला भारतीय व्यापाऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडून सुद्धा सरकार व्यापाऱ्याच्या अडचणी सोडविण्यासाठी कुठलीही पावले उचलताना दिसून येत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे.
मोदी सरकार ऑनलाईन व्यापारावर कारवाई न करता देशभरातील व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर रोष ओढवून घेत आहे.
या पार्श्वभूमीवर अमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेजोस हे भारत भेटीवर आले असून भारतामध्ये सर्व व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण आहे.ऑनलाईनसाठी पायघड्या टाकायच्या आणि देशभरातील व्यापार अमेरिकेच्या हातात सोपवायच्या सरकारी धोरणाच्या विरोधात मोबाईल व्यापारी आता एकत्रित लढा उभारताना दिसून येतोय.सदर मोहिमेचा भाग म्हणून अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशन यांच्यावतीने जेफ बेजोस चले जाव, अमेझॉन, फ्लिपकार्ट चले जाव च्या घोषणा देऊन वाडिया पार्क येथील गांधी पुतळ्यासमोर मोठे आंदोलन करण्यात आले.
ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारखे परदेशी कंपन्या म्हणजे दुसरी इंग्रजी राजवट आहे.आपल्या भारताचा व्यापार परदेशी कंपन्यांच्या हातात घेऊन इथला स्थानिक व्यापारी संपवण्याचे षडयंत्र सरकार करत आहे. वास्तविक पाहता ऑनलाइन आणि ऑफलाईन मार्केटमध्ये सर्व मोबाईलचे दर हे सारखेच असून तसेच ऑनलाइन खरेदी मध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून बहुतांशी नकली वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. ऑनलाईन खरेदी वरती कुठल्याही प्रकारची सेवा ग्राहकांना देण्यात येत नाही हे महत्वाचे. फसवणूक झाल्यास ग्राहकाला मनस्ताप तर होतोच आणि न्याय मागायला जागाही नसते.सुरुवातीपासूनच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट अमेरिकन कंपन्यांनी एफडीआय पॉलिसीचे वारंवार उल्लंघन केलेले आहे.या सर्व गोष्टी सरकारच्या वेळोवेळी निदर्शनास आणून सुद्धा सरकार कुठलीही कारवाई करण्यास पुढे येत नाही.आजमितीस संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 30 ते 40 हजार मोबाईल दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत.अशी जर परिस्थिती राहिली आणि सरकारने या अमेरिकी कंपन्यांवर काही कारवाई केली नाही तर पुढील काही वर्षात ऑफलाईन मार्केट बंद पडण्याच्या स्थितीमध्ये येईल आणि त्या अनुषंगाने भारतीयांची रोजीरोटी जाऊन मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल याचे गांभीर्य सरकारला आहे का ?
अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्यावतीने सर्व भारतवासीयांना आवाहन करण्यात येते की इथून पुढे आपण कुठलीही गोष्ट खरेदी करताना एक वेळेस तरी आपल्या जवळच्या स्थानिक दुकानदारांकडे जाऊन चौकशी करावी आणि ऑनलाइन ऑफलाइन चे दर सारखेच असल्यामुळे आपल्या स्थानिक दुकानदाराकडूनच खरेदी करावी म्हणजे आपली फसवणूक होणार नाही आणि विक्री पश्चात सेवा सुद्धा चांगली मिळेल.
8 जानेवारीपासून दिल्ली येथे झालेल्या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग बनून आज सर्व स्थानिक विक्रेत्यांकडून ॲमेझॉन फ्लिपकार्ट चले जाव,जेफ बेजोस चले जाव असा नारा देऊन सरकारच्या विरोधात मोठे शक्ती प्रदर्शन व घोषणाबाजी करण्यात आली.
संपूर्ण भारतात सुरू झालेल्या ऑनलाईन चले-जाव आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप यांनी केले.
अजित पवार,संतोष बलदोटा, अतुल रच्चा,मनीष चोपडा,महेश घावटे, हिरासेठ,भुपेंद्र रासने,आकाश घाटविसावे,शुभम जगताप, मुकुंद कसानी,सागर नहार, गोरख पडोळे, पंचम पडोळे, अविनाश निकरड, निखिल गोपलानी, नितीन नामदे,राकेश सोनवणे,वैभव बारसे आदी सदस्य आंदोलनावेळी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post