केंद्र सरकारची मदत जाहीर, महाराष्ट्राला मिळणार ९५६.९३ कोटी
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : २०१९मधील पूरग्रस्त तसेच अवकाळीग्रस्तांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली असून ही मदत सात राज्यांसाठी जवळपास ५९०८ कोटींची आहे. त्यात महाराष्ट्राला ९५६.९३ कोटी रुपयांचे अतिरिक्त सहाय्य मिळणार असून याद्वारे बळीराजाला दिलासा मिळू शकणार आहे.
प्रामुख्याने त्रिपुरासाठी ३६७ कोटी, हिमाचल प्रदेश २८४.९३ कोटी, कर्नाटक राज्याला १८६९.८५ कोटी, आसामला- ६१६.६३ कोटी या भाजप शासित राज्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मध्य प्रदेशला १७४९.७३ कोटी आणि महाराष्ट्राला ९५६.९३ कोटी मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.
मागील वर्ष एकूणच हवामानाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल आणि नुकसानकारक ठरले. महाराष्ट्रात सुरुवातीला मान्सून आलाच नाही आणि नंतर कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने कहर केला. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेच, पण कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. अजूनही अवकाळीचा कहर थांबलेला नसून पिकांच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २०१९ च्या नैऋत्य मान्सूनमधे पूर, ढगफुटी, भुस्खलन याचा फटका बसलेल्या सात राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून एकूण ५९०८.५६ कोटी रुपयांचे अतिरिक्त केंद्रीय सहाय्य द्यायला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली आहे.
महाराष्ट्राला ९५६.९३ कोटी रुपयांचे सहाय्य मिळणार आहे. याशिवाय आसाम, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनाही आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याआधी केंद्र सरकारने महाराष्ट्राला ६०० कोटी रुपयांचे अंतरिम वित्तीय सहाय्य दिले आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि बिहारलाही हे अंतरिम सहाय्य देण्यात आले आहे.
आता महाविकास आघाडीचे सरकार केंद्राने दिलेल्या या निधीचे कशा प्रकारे वाटप करेल आणि उर्वरित आवश्यक रकमेसाठी केंद्र सरकारडे पाठपुरावा करणार का हे येणा-या काळातच स्पष्ट होईल.
अवघ्या तीन दिवसांपूर्वी विदर्भाला वादळी वारे आणि मुसळधार पावसासह झालेल्या गारपिटीने झोडपले. त्यामुळे शेतपिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस झाला असून, सोलापुरात पावसाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडय़ात परभणी, लातूर, हिंगोलीतही पावसाने हजेरी लावली. अहमदनगरमध्ये दाट धुके पडले असून, द्राक्ष आणि कांद्याचे नुकसान झाले. उपराजधानीसह विदर्भातील अमरावती, वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांत झालेली गारपीट आणि वादळी वा-यासह मुसळधार पावसामुळे शेतपिकांसह फळबागांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काटोल आणि नरखेड तालुक्यातही गारपीट झाल्याने संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले. शहरात गारपीट आणि पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले.
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, तिवसा, चांदूर रेल्वे या तालुक्यांना गारपिटीचा फटका बसला. खरिपातील तूर, कापूस आणि रब्बीतील गहू, हरभरा, कांदा या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे शेतातील उभी पिके सपाट झाली. काढणीला आलेली तूर आणि कापसाला याचा सर्वाधिक फटका बसला. विदभार्तील अवकाळी पावसामुळे सुमारे ५० टक्के संत्रा बागांवर परिणाम होण्याची शक्यता संत्रा बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा, आष्टी, आर्वी भागात गारा पडल्या. आर्वी तालुक्यातील गारपिटीमुळे सुमारे 5०० हेक्टर शेतीला त्याचा फटका बसला.
Post a Comment