माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात अजित पवारांच्या पाठिंब्याने झालेल्या भाजप सरकार स्थापनेवर मलाही आश्चर्य झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिक आमदार या सरकारमध्ये जाणार नाहीत. तरीही ते भाजपमध्ये जात असतील तर देशात पक्षांतरबंदी कायदा आहेच असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. पक्षांतरबंदी अंतर्गत त्याची सदस्यता जाणार याची शक्यता नाकारता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात आहे. तरीही त्यास झुगारून आमचे काही आमदार भाजपला पाठिंबा देत असतील तर आम्ही काय, त्यांना जनता देखील माफ करणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, अजित पवारांसोबत जे आमदार राजभवनावर गेले त्यांना देखील आपण काय करतोय याची कल्पना नव्हती असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे काही आमदार देखील आणले आणि त्यांना बोलण्याची संधी दिली. यामध्ये एकानंतर एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी सकाळी झालेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. आम्हाला सर्वांना राजभवनावर शनिवारी सकाळी नेण्यात आले. का नेले जात आहे याची काहीच माहिती दिली नाही. यानंतर शपथविधी झाला तेव्हा संपूर्ण प्रकार लक्षात आला असा दावा या आमदारांनी केला आहे. यामध्ये संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश होता.
कुठल्याही संकटात एकत्रच राहू, उद्धव ठाकरेंसह पवारांचे आश्वासन
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रित येऊन सरकार स्थापनेचा निर्णय घेतला होता. यासाठी शनिवारी अंतिम बैठक देखील होणार होती. परंतु, ऐनवेळी शनिवारी सकाळीच मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठल्याही परिस्थितीत एकत्रच राहतील. असे संयुक्तरित्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.
Post a Comment