भारताचा 502 धावांवर डाव घोषित






माय नगर वेब टीम
विशाखापट्टणम - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचे दीडशतक आणि मयंक अग्रवालचे द्विशतक याच्या जोरावर भारताने पहिला डाव 502 धावांवर घोषित केला. अखेरच्या क्षणी रविंद्र जडेजाने ऋद्धिमान साहाला साथीला घेऊन फटकेबाजी केल्यानं संघाची धावसंख्या पाचशेच्या वर पोहोचली. भारतानं डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे फंलदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. आर अश्विनने एडन मार्करमचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर थेइनिस ब्रुनला बाद केलं. तर जडेजाने डेन पिएटचा त्रिफळा उद्धस्त करून दक्षिण आफ्रिकेला तिसरा दणका दिला. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेच्या 3 बाद 39 धावा झाल्या होत्या. भारताकडे पहिल्या डावात 463 धावांची आघाडी आहे.

त्याआधी, सलामीवीर मयांक अग्रवालने झळकावलेल्या द्विशतकाच्या जोरावर पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी भारताने धावांचा डोंगर उभा केला. दुसर्‍या दिवसाच्या चहापानापर्यंतच्या सत्रापर्यंत भारताने 5 गडी गमावत 450 धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर मयांकने अन्य फलंदाजांना हाताशी धरत फटकेबाजी सुरु ठेवली. कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक झळकावणार्‍या मयांकने या शतकी खेळीचं द्विशतकी खेळीत रुपांतर केलं. त्याने 371 चेंडूत 215 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 23 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. डीन एल्गरने मयांक अग्रवालला माघारी धाडलं. भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पहिल्या डावात थोडीशी निराशा केली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र मयांकने एक बाजू लावून धरली. त्याआधी, पहिल्या दिवशी बिनबाद 202 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर, दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत भारताने रोहित शर्माच्या विकेटच्या मोबदल्यात 324 धावांपर्यंत मजल मारली. केशव महाराजने सकाळच्या सत्रात रोहित शर्माचा एकमेव बळी घेतला.

दुसर्‍या दिवशीही भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी आफ्रिकन गोलंदाजांवर प्रहार करायला सुरुवात केली. मयांक अग्रवालने 84 धावांवरुन आपलं कसोटी क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकावलं. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 317 धावांची भागीदारी केली. अखेरीस केशव महाराजच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित यष्टीचीत होऊन माघारी परतला. त्याने 244 चेंडूत 176 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 23 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

मयंक अग्रवालने या सामन्यात 204 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार खेचले. याआधी त्याच्या नावावर तीन अर्धशतकं आहेत. मयंकने पदार्पणाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक केलं होतं. तर दुसर्‍या सामन्यातही त्यानं अर्धशतकी खेळी केली होती. डिसेंबर 2018 मध्ये त्यानं पदार्पण केलं होतं. त्याला वर्ल्ड कपमध्ये बदली खेळाडू म्हणूनही संघात घेतलं होतं. मात्र, खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

500 धावांचा पल्ला ओलांडल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवाल माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतले फलंदाज पुरते अपयशी ठरले. रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारीने झटपट धावा जमावत भारताला 500 धावांचा टप्पा ओलांडून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने 3, तर फिलँडर-पिडीट-मुथुस्वामी-एल्गर यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post