राहुरीतील ऊस उत्पादकांची दिवाळी गोड


प्रसाद शुगरकडून पावने बारा कोटी वर्ग

माय नगर वेब टीम

अहमदनगर - राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर,(वांबोरी) ने मागील सन २०१८-१९ गळीत हंगामात गाळप केलेल्या ५ लाख ७ हजार ९३२ मे. टन उसाचे २२१ रुपये प्रति टन प्रमाणे ११ कोटी ७८ लाख ९१ हजार २०० रुपये ऊस बिलाची रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे, ऊस दर दोन हजार ३२१ रुपये झाला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. असे कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, "कारखान्याने शेतकरी हितास कायम प्राधान्य दिले. दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांना ऊसबिलाची रक्कम हाती पडणार असल्याने राहुरीची व्यापारी पेठ फुलणार आहे. मागील हंगामात यापूर्वी २१०० रुपये प्रति टन प्रमाणे ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली होती. आता २२१ रुपये प्रति टन याप्रमाणे ऊसबिले दिल्याने मागील हंगामाचा ऊस दर २३२१ रुपये झाला आहे. आगामी सन २०१९-२० गाळप हंगाम सुरु करण्यासाठी सर्व पुर्वतयारी केली आहे. मशीनरी सज्ज केली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील उभ्या ऊस पिकाचा आढावा घेऊन, कारखाना चालू करण्याचा निर्णय घेतला जाईल."

"४५ हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला इथेनॉल व आसवणी प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. जून २०२० अखेर प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या २४ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे काम आॅक्टोंबर २०२० अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कारखान्याचे उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील हंगामात राज्यातील प्रगत कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्यासाठी कटिबद्ध राहिल." असेही देशमुख यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post