चौकशी झाल्यापासून राज ठाकरे बोलायचे कमी झाले : अजित पवार





माय नगर वेब टीम
 बारामती - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आल्यापासून ते बोलायचे कमी झाले, असं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. बारामती मधील सोमेश्वर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकश्यांची भीती दाखवत आहेत, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ईडीमार्फत चौकशी झाल्यापासून बोलायचे कमी झाले आहेत, असंही ते म्हणाले. 22 ऑगस्टला राज ठाकरे यांची कथित कोहिनूर स्क्वेअर घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज यांची साडेआठ तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती. यावेळी ईडीच्या प्रश्नांना राज ठाकरेंनी काय उत्तरं दिली हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर "या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही", अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. मात्र ही चौकशी करण्यात आल्यापासून राज ठाकरे बोलायचे कमी झाल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना चौकश्यांची भीती दाखवण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post