'साईकृपा'मुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते अडचणीत!


माय नगर वेब टीम
अहमदनगर – माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या संबंधित असलेल्या साईकृपा (१) खासगी कारखान्याने ऊस उत्पादकांचे देणे थकविलेले असल्याने या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत पाचपुते यांना हा मोठा झटका मानला जात असून 'साईकृपा'मुळे माजी मंत्री अडचणीत सापडले आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाचे वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई झालेली आहे. त्यातील पाच कारखान्यांनी ऊस उत्पादकांची सर्व थकित रक्कम दिलेली असून, तीन कारखान्यांकडे ‘एफआरपी’ची थकबाकी आहे. त्यात पाचपुते यांच्या संबंधित दोन कारखाने आहेत. पाचपुते यांच्या संबंधित देवदैठण येथील साईकृपा खासगी कारखान्यावर ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.

याबाबतचा आदेश नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयाला सोमवारी मिळाला आहे. साईकृपा (१) या कारखान्याकडे ‘एफआरपी’ची ३ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम थकित आहे. या कारवाईनुसार महसूल प्रशासन शिल्लक साखर व बगॅसची विक्रीतून वसुली करून ऊस उत्पादकांना देणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाचपुते यांना मोठा धक्का बसला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post