मोदी सरकारचा मोठा निर्णय
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली
दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडलाच पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र दलातील शहीद जवानांच्या मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार केला आहे.
नक्षलवादी आणि दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांचा शिष्यवृत्ती योजनेत समावेश केला आहे. या योजनेतंर्गत दर महिन्याला देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्येही वाढ केली आहे. मुलांची शिष्यवृत्ती दोन हजारवरुन अडीच हजार आणि मुलींच्या शिष्यवृत्तीत २२५० वरुन तीन हजार रुपये वाढ केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रीय संरक्षण निधी अंतर्गत असलेल्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत बदल करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली.
तसेच या शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. दहशतवादी अथवा नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांनाही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयांची माहिती स्वतः पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत दिली. जे देशाचे संरक्षण करतात; त्यांच्यासाठी आमच्या सरकारचा पहिला निर्णय समर्पित. राष्ट्रीय संरक्षण निधी अंतर्गत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत बदल करण्यास मंजुरी दिली आहे, असे मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

Post a Comment