पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेमार्फत भिस्तबाग महाल परिसरात वृक्ष लागवड



पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन आवश्यक - आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे 

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर - वृक्ष लागवड ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे. झाडे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. ज्यामुळे हवा शुद्ध होते आणि तापमान कमी होते. तसेच, झाडे मातीची धूप रोखतात, पाऊस नियंत्रित करतात, आणि पशू, पक्षी, वन्यजीवनासाठी निवारा उपलब्ध करतात. झाडे आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी पुरवतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. त्यामुळे, आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे संवर्धन करणे, तसेच पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात वृक्ष लागवड करण्यात आली. भिस्तबाग महल परिसरात या वृक्ष लागवडीचा शुभारंभ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक संपत बारस्कर, सागर बोरुडे, प्रभागातील नागरिक उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. 


संपत बारस्कर म्हणाले की, झाडे मानवासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि ताण कमी करतात. झाडे आपल्या आजूबाजूला शांतता आणि सौंदर्य निर्माण करतात, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. त्यामुळे संपूर्ण शहरात वृक्ष लागवड चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.


दरम्यान, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार, ५ जूनपासून शहरातील झाडांवर लावलेल्या जाहिराती काढणे, फांद्यांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा काढण्याची मोहीम महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. शहरातील अनेक झाडांवर खिळे ठोकून पोस्टर, बॅनर लावून जाहिराती केल्या जात आहेत. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या जाहिराती हरवणे, झाडांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा काढणे, झाडाभोवती असलेले जुने व खराब झालेले, तुटफूट झालेले ट्री गार्ड काढून घेणे आदी कामे या मोहिमेत करण्यात येत असल्याचे उपायुक्त संतोष टेंगले यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post