पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी ; असे दिले आदेश...

 


पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे 


स्मशानभूमीतील तुटलेल्या जाळ्या लवकरच बसवण्याचे आश्वासन 

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर - पावसामुळे महानगरपालिकेच्या केडगाव अमरधाम व आंबेडकर भवनाची भिंत खचून पडली आहे. या दोन्ही भिंती नव्याने बांधण्यात येणार असून, त्याचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, केडगाव अमरधाम स्मशानभूमीतील दहन ओट्यावरील जाळ्या तुटल्या आहेत. त्याची दुरुस्ती व नवीन जाळ्या लवकरच बसवण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले.


आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शनिवारी सकाळी केडगाव परिसरात पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर उपस्थित होते. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केडगाव अमरधाम येथे पडलेल्या भिंतीची पाहणी केली. तसेच, स्मशानभूमीतील अंतर्गत सुविधांचीही त्यांनी पाहणी केली. तेथील जाळ्यांची दुरवस्था झाल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी येतात, त्यामुळे या जाळ्यांची दुरुस्ती किंवा नवीन जाळ्या बसवणे आवश्यक असल्याचे कोतकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. 


तसेच, आंबेडकर भवनाच्या भिंतीचीही आयुक्तांनी पाहणी केली. अमरधाम व आंबेडकर भवन या दोन्ही ठिकाणी भिंत बांधण्याचे काम तत्काळ सुरू होईल. त्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. केडगाव अमरधाम स्मशानभूमी येथील जाळ्या बसविण्याबाबत तत्काळ प्रशासकीय प्रक्रिया करून काम सुरू केले जाईल, स्मशानभूमीत इतर सुविधांच्या सुधारणेबाबतही लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post