प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने राजकारणात मोठी खळबळ, 4 जूननंतर...



माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई - “राजकारणात 4 जूननंतर काहीही होऊ शकतं”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही भाजपसोबत जाण्याचा विचार होता, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी बैठक झाली होती, अशी माहिती पटेलांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याची आमची सर्वांची भूमिका आहे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादीने लढवण्याबाबत चर्चा झाल्याचंदेखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. “मी कुणाच्याबद्दल चांगलं-वाईट काहीही बोलणार नाही. पण शिवसेनेचे नाशिकचे जे खासदार आहेत त्यांच्याऐवजी दुसरं कुणाला उमेदवारी द्यावी, अशी चर्चा सुरु होती. त्या अनुषंगाने ही जागा राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांना द्यावी. ही जागा राष्ट्रवादीकडे यावी, अशी चर्चा झाली होती”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

प्रफुल्ल पटेल यांनी नुकतंच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. शरद पवार यांना भाजपसोब येण्याची 50 टक्के इच्छा होती, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं. “आम्ही त्यावेळी चर्चा केलीच ना. आम्ही दोनवेळा शरद पवारांची भेट घेतली. चर्चा केली. त्यांना सोबत येण्याची विनंती केली. आम्ही पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले. तुम्ही सोबत राहिले तर आम्हाला अतिशय आनंद होईल. तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करु इच्छित आहोत. त्यावेळेस मला तरी वाटलं की हे अनुकूल आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

‘राजकारणात काहीही होऊ शकतं’

“त्यावेळी पुण्याच्या उद्योगपतींच्या घरी चर्चा झाली. जयंत पाटील या बैठकीत होते. जवळ यायचंच नव्हतं तर बैठक कशासाठी झाली? काहीतरी विचार होता. वेगळं झाल्यानंतर परत चर्चा कशी? समाधन होत असेल तर प्रयत्न करायचे. राजकारणात काहीही होऊ शकतं. आमची भूमिका नरेंद्र मोदी यांना साथ देऊ इच्छित आहोत”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सातारा लोकसभेच्या जागेबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. “खासदार उदयनराजे भोसले पूर्वी आमच्या चिन्हावरच खासदार झाले होते. त्यांना आम्हीसुद्धा उमेदवारी देऊ शकतो. शेवटी छत्रपती घराणं आहे, प्रसिद्ध चेहरा आहे. गेल्यावेळी भूमिका बदलल्यामुळे नागरिकांनी तशी प्रतिक्रिया दिली. पण ते अनेकदा साताऱ्यातून जिंकून आले आहेत. उदयनराजे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. फक्त साताराच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आम्ही तयार आहोत. याबाबतच्या प्रश्नावर आम्ही एक-दोन दिवसांत चर्चा करुन निर्णय घेऊ. राष्ट्रवादी सहा-सात जागांवर सहज लढणार”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post