नागरिकांनो खासदार होऊ द्या, तुम्हाला संसद भवन दाखवतो; लंकेंचा मतदारांना 'शब्द', नागरिकांनी केला एकच जल्लोष...



आ. लंकेंच्या जनसंवाद यात्रेत दुसऱ्या दिवशीही उत्साहाला उधाण !

शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग / मदतीचाही हातभार / जनतेच्या प्रेमाने आ. लंके भारावले 

माय अहमदनगर वेब टीम 

पाथर्डी, शेवगांव  -    नगर दक्षिण मतदारसंघाच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर नीलेश लंके यांनी सोमवारपासून सुरू केलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेस दुसऱ्या दिवशीही पाथर्डी-शेवगांव  मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद लाभला. गावागावांमध्ये यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नागरिकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे नीलेश लंके हे भारावून गेले.  दरम्यान मी खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांना संसद भवन दाखविण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे सांगताच उपस्थित नागरिकांनी आमदार लंके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा दिला.



       नगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नीलेश लंके यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर लंके यांनी मतदारसंघात स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. सोमवारी या यात्रेचा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. शुभारंभास मोठा प्रतिसाद लाभल्यानंतर दुसऱ्या दिवशीही या यात्रेमध्ये नागरिकांच्या उत्साहास उधाण आल्याचे चित्र पहावयास मिळाले. राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते.

      यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आ. लंके म्हणाले, पुर्वाश्रमीचा शिवसैनिक असल्याने माझी उमेदवारी जाहिर झाल्याने राष्ट्रवादीसह शिवसैनिकांना मोठा आनंद झाला. माझ्यासारख्या सामान्य घरातील तरूणास उमेदवारी मिळाल्याने ही निवडणूक आता जनतेनेच हाती घेतली आहे. कालच मी आई मोहटादेवीचरणी नतमस्तक झालो असून आईने मला आशिर्वाद दिल्याने या निवडणूकीत विजयी होऊन मी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी दिल्लीस जाणार असल्याचा आत्मविश्‍वास लंके यांनी व्यक्त केला. 

         स्व. बबनराव ढाकणे यांनी या भागाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी मतदारसंघातील नागरिकांना देशाचे संसद भवन दाखविले. विद्यमान खासदारांनी हे का केेले नाही? मी खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांना संसद भवन दाखविण्यासाठी घेऊन जाणार आहे.


विळद घाटातील अतिक्रमणावर कारवाई कधी ?  

शेतमालाच्या भावाबद्दल खासदारांना प्रश्‍न विचारला म्हणून दुसऱ्या दिवशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित शेतकऱ्याचे शेत तळे काढण्यासंदर्भात कारवाईच्या सुचना देण्यात आल्या. एकीकडे शेतकऱ्याचे शेततळयाचे अतिक्रमण काढण्यासाठी दबाव आणला जात असताना दुसरीकडे विळद घाटात शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण करणारांविरोधात कारवाई का नाही असा सवालही लंके यांनी यावेळी उपस्थित केला. 

कोटवयाधींच्या कराचे काय ?

नगर महानगर पालिकेच्या कोटयावधी रूपयांच्या करास खासदारांनी चुना लावल्याचा आरोप लंके यांनी यावेळी केला. सत्तेतून संपत्ती कमवायची, त्यानंतर मोठया गप्पा मारायच्या, जनतेचा भुलभुल्लैया करायचा असा हा प्रकार असून ही एक बाजू आहे तर दुसरीकडे राजकारणाच्या माध्यमातून सत्ता व त्यातून सामान्यांचा न्याय देण्याची भूमिका घ्यायची या भुमीकेतून आपण काम करतो आहोत. जनता माझ्या पाठीशी असून या निवडणूकीत विजय हा सर्वसामान्य जनतेचा म्हणजेच आपला असल्याचा दावा लंके यांनी केला.  

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post