गुजरातचा ६ धावांनी थरारक विजय; हार्दिकला 'ती' चूक नडली



स्पोर्ट डेस्क - आयपीएलच्या १७ व्या हंगामातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला. शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात गुजरातने ६ धावांनी थरारक विजय मिळवला. एकवेळ मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकणार असं वाटत होतं. मात्र, फक्त एका चेंडूने संपूर्ण सामना गुजरातच्या बाजूने झुकवला.



हाच मुंबई इंडियाच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट ठरला. मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने गुजरातला अवघ्या १६८ धावांवर रोखलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. 


सलामीवर इशान किशनला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर, रोहित शर्माने मुंबईला अडचणीतून बाहेर काढले. पण तो ४३ धावांवर बाद झाला. रोहितनंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आणि तिलक वर्मा यांची चांगलीच जोडी जमली होती. ब्रेव्हिसने ४६ धावा, तर तिलक २५ धावांवर बाद झाला.



दोघेही बाद झाल्यानंतर मुंबईचा संघ सुस्थितीत होता. पण, त्यावेळी एक चेंडू असा पडला की ज्यामुळे मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. गुजरातकडून उमेश यादव गोलंदाजी करत होता. मुंबईसाठी चांगली बाब म्हणजे हार्दिक पांड्या मैदानावर होता. हार्दिकने पहिल्या चेंडूत एक षटकार आणि दुसऱ्या चेंडूत चौकार लगावला.


त्यामुळे मुंबईला विजयासाठी ४ चेंडूत अवघ्या ९ धावांची गरज होती. हार्दिक मुंबईला सहज विजय मिळवून देणार असं वाटत होतं. पण, उमेश यादवला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. तिथेच सामना गुजरातच्या दिशेने फिरला. उमेश यादवचा तो एकच चेंडू मुंबईच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट ठरला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post