ही तर आणीबाणीची वेळ, राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा- राज ठाकरे

 


मुंबई | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब चक्रीवादळाचा फटका पुर्व किनारपट्टीला बसलेला दिसत आहे. त्याचा परिणाम मात्र महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळाधार पाऊसामुळे लाखो हेक्टर जमिनीचं नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

मराठवाड, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील बहुतांश भागात पावसाने कहर केला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं आहे. त्याचबरोबर घरादारांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ही आणीबाणीची वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्याला तातडीने 50 हजारांची मदत जाहीर करावी आणि प्रत्यक्षात देखील तात्काळ मदत पुरवावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

पचंनामे होत राहतील, परंतु मदत पोहचवणं गरजेचं आहे. आधी कोरोनाचं संकट आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी पार कोलमडलाय. त्यामुळे निव्वळ आश्वासनाची नाही तर कृतीची गरज असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी आतापर्यंत ज्यांचीशी बोललोय त्यानुसार, आता वाट पाहण्याची ताकद शेतकरी बांधवांकडे नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकारने सत्वर पाऊले टाकावीत, सध्याची ही परिस्थिती पाहता शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post