मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना दिला ‘हा’ इशारा

 


मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. यानंतर उद्धव ठाकरेंनी राज्यातील नागरिकांना इशारा दिला आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणं गरजेचं असून आपलं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावं म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घेण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

कोविडविषयक नियमांचं पालन न केल्याने, तसेच गर्दी जमा करणं, मास्क न लावणं यामुळे स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहोचवत आहोत. माझे आपणास आवाहन आहे की, कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post