राज्यात महिला असुरक्षित ; नवीन कायदा लागू करा- भाजपा



दिल्लीगेट येथे महिला भाजपाच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- भारतीय जनता पार्टीच्या शहर व दक्षिण विभागाच्या महिला आघाडीच्यावतीने राज्यातील विविध भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेशीजवळ धरणे आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, जिल्हा सरचिटणीस सुरेखा विद्ये, सरचिटणीस वंदना पंडित,  कॅन्टों.सदस्या शुभांगी साठे, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, प्रिया जानवे, नगरसेविका पल्लवी जाधव, पंचायत समिती सदस्या स्वाती कराळे,  अरणगावच्या सरपंच स्वाती गहिले, रेश्मा शेख, नंदा चाबुकस्वार, अर्चना चौधरी, मनिषा गहिले, ज्योत्स्ना मुंगी, संगीता मुळे आदि महिला पदाधिकार्यांसह भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, अजय चितळे, महेश तवले, विवेक नाईक, अनिल गट्टाणी, तुषार पोटे, राजेंद्र विद्ये आदिंसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी भाजपाच्या सुरेखा विद्ये म्हणाल्या, महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. कोविडच्या महामारीतही राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत, कोव्हीड सेंटरमध्ये कोरोना बाधित मुलीवर अत्याचार होत आहेत तर राज्यातील नांदूरा, जालना, करंजे विहिरे, रोहा, मुंबई, गोरेगांव, पाबळ, पनवले, कोल्हापुर, औरंगाबाद अशा सर्वच ठिकाणी महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन कायदा करण्याचे जाहीर केले होते, मात्र अद्याप निर्णय घेतला नाही. महिलांवरील जे अत्याचार होत आहेत. याची साधी दखलही हे सरकार घेत नाही. मग या आघाडी सरकारचा आपल्याला उपयोग काय?  राज्यामध्ये राज्य महिला आयोग व बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदे अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे अत्याचारित महिलांनी दाद मागायची कोणाकडे. म्हणून आम्ही शहर व जिल्हा भाजपा महिला आघाडीच्यावतीने महिला सुरक्षेचा नवीन कायदा त्वरित लागू करण्याची मागणी राज्य सरकारकडे करत आहोत, असे म्हणाल्या. 

यावेळी अश्विनी थोरात म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचाराचा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे थांबणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील आघाडी सरकार अत्याचार थांबण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसून, त्यांना अत्याचाराशी काही देणे घेणे नाही. सर्व मंत्री आपले सरकार टिकण्यासाठीच प्रयत्नशील आहेत. अशा निष्क्रीय सरकारचा महिला आघाडी निषेध करत असून, त्वरित महिलांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना राज्यसरकारने राबविण्याची मागणी या ठिकाणी करत आहोत. 

यावेळी वंदना पंडित म्हणाल्या, राज्यात महिलांची सुरक्षा करण्यात हे आघाडी सरकार पूर्णपणे निष्क्रीय ठरले आहे, त्यामुळे या सरकारला खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. संगीता खरमाळे म्हणाल्या, पोलिस अधिकारीच जर महिलांवर अत्याचार करत असतील तर दाद मागायची कोणाकडे, राज्यात रक्षकच भक्षकच होऊ लागले आहेत. 

यावेळी महेंद्र गंधे, वसंत लोढा यांनीही राज्य सरकारच्या निषेधार्थ भाषणे केेली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post