लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही: मुख्यमंत्री ठाकरे


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 'महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही. त्यामुळं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून गडबड, गोंधळ करू नका. विनाकारण कुठेही गर्दी करू नका,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.
राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियातून पसरलं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

'आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post