माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर तालुका बाजार समितीच्या उपबाजार आवर नेप्ती येथे उद्या दिनांक २९ मे २०२० पासून भाजीपाला आणि फळांचे लिलाव शेतकरी व खरेदीदार यांचे आग्रहास्तव रोज संध्याकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सुरू राहतील. तसेच दररोज सकाळी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत सुध्दा भाजीपाला व फळे विक्री नेप्ती उपबाजार येथे सुरू राहील. हा निर्णय समितीचे सभापती अभिलाष घिगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज दिनांक २८ मे २०२० रोजी झाला आहे.
तरी सर्व शेतकऱ्यांनी व खरेदीदारांनी याची नोंद घ्यावी. आणि जास्तीत जास्त शेतमाल शेतकऱ्यांनी नेप्ती उपबाजार येथे विक्रीसाठी आणावा तसेच जास्तीत जास्त खरेदीदरांनी सायंकाळी होणाऱ्या लिलावात भाग घ्यावा असे आवाहन बाजार समिती मार्फत करण्यात आले आहे. सायंकाळी होणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लीलावामुळे राज्यातील इतर प्रमुख बाजारपेठा म्हणजेच पुणे, मुंबई, कल्याण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या ठिकाणी नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथून शेतमाल जास्तीत जास्त पाठवता येईल आणि शेतकऱ्यांच्या मालाला सुध्दा बाजारभाव जास्त मिळेल. तसेच शेतकऱ्यांना बाजारसमितीमध्ये जास्तीत जास्त शेतमाल विक्रीस आणता येईल त्याबरोबर वाहतूक खर्चातही बचत होईल असा विश्वास यावेळी सभापती यांनी व्यक्त केला. यावेळी समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, संचालक सर्वश्री हरिभाऊ कर्डिले, रेवणनाथ चोभे, संतोष कुलट, दिलीप भालसिंग, वसंत सोनवणे, बाबासाहेब जाधव, शिवाजी कार्ले, बाळासाहेब निमसे, बन्सी कराळे, बाबासाहेब खर्से, बबन आव्हाड, सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते.
Post a Comment