...अन्यथा शुक्रवारपासून महापालिकेचे कर्मचारी करणार अन्नत्याग


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधक उपाययोजना व त्या संबंधी मोहिमेत ज्या शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत, अशा कर्मचा-यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत. महापालिकेचे सुमारे दीड हजार कर्मचारी या उपाययोजना राबविण्यात व सेवा पुरविण्यात सक्रिय आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण व सुरक्षा कवच द्यावे. दोन दिवसात याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा शुक्रवार पासून (ता. 17) कर्मचारी अन्नत्याग आंदोलन सुरू करतील, असा इशारा महापालिका कामगार युनियनने दिला आहे.

युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भात आदेश दिलेले आहेत. 'कोव्हीड 19' या मोहिमेअंतर्गत महापालिकेचे आयुक्त या नात्याने आपली नेमणूक करण्यांत आलेली असून महापालिका क्षेत्राबाबतची जबाबदारी आपल्यावर व पर्यायाने अहमदनगर महापालिकेवर सोपविण्यात आलेली आहे. अहमदनगर महानगरपालिकेमार्फतही या मोहिमेत शिपाई ते लिपिक पदापासून थेट आयुक्त अशा तब्बल दीड हजार कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये महापालिका आयुक्त, दोन्ही उपायुक्त, शहर अभियंता, प्रभाग अधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख, सर्व स्वच्छता निरिक्षक, सर्व अभियंते, सुमारे 850 सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी, खाजगी ठेकेदाराचे 100 हून अधिक कर्मचारी व इतर 500 ते 600 कर्मचारी विविध उपाययोजना व नियोजनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी झालेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रकोप व प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने संबधित कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास व जिवितास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे या कर्मचा-यांना प्रधान मंत्री गरिब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण देण्यासाठी कोरोना (कोव्हीड 19) प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच योजना तातडीने लागू करणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महापालिका यांनी त्यांच्या महानगरपालिकेतील सदर मोहीमेत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयाचे विमा संरक्षण दिले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर अहमदनगर महापालिकेतील सर्व संबधित कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे. कोरोना विषाणू (कोव्हीड 19) प्रतिबंध व उपचार सुरक्षा योजना तातडीने लागू करण्याचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात यावा, अशी मागणी युनियनच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.

यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास महापालिकेतील सर्व कर्मचारी त्यांना नेमुन दिलेल्या सेवेत रुजू राहून शुक्रवार (ता. १७) पासून बेमुदत अन्नत्याग अंदोलन सुरु करतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. सदर मागणी बाबत राज्य शासनालाही कळविण्यात आले असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post