इंदोरीकरांची जंगी मिरवणूक, बीडमध्ये प्रतिमेला दुग्ध अभिषेक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर काही ठिकाणी टीका होत आहे तर काही ठिकाणी पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये त्यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ दोन गट पडल्याचे दिसून येत आहेत.
पिंपरीमध्ये नुकतीच इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. बीडमध्ये त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला. दरम्यान, सम-विषम तिथीवरून मुलगा-मुलगीबाबत भाष्य करून वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम काल पुण्यात झाला. शिवजयंती महोत्सवानिमित्त मोशी गावात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मोशी ग्रामस्थांनी इंदोरीकर महाराजांची गावाच्या वेशीपासून बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. यावेळी इंदोरीकर महाराजांनी शिवजयंतीनिमित्त खास सल्ला दिला. शिवजयंतीला संकल्प करा की एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तर त्याची राख नदीत टाकू नका. ती राख शेतीतील मातीत टाका. किंवा त्या व्यक्तीच्या नावाने झाड लावून, त्या झाडाला ती राख टाका, झाडे वाढतील आणि नद्या निर्मळ राहतील, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.
राख शेतात टाका. शेतात नसेल तर घरी घेऊन ती झाडाच्या कुंडीत टाका. गावातला माणूस गावात सुखाने जगेल हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. नदी स्वच्छ होईल. शिवार झाडांनी भरुन जाईल, शिवरायांचं स्वप्न साकार होईलफ, असं इंदोरीकर महाराजांनी सांगितलं.
ज्ञानोबाराय पण झाडं लावण्याचा सल्ला देत होते. झाडाला एक वर्ष पाणी घातलं तर झाड माणसाला आयुष्यभर सेवा देईल. शाळेत जाणार्यांनी शाळेत एक झाड लावावं, सासरी आलेल्या मुलीने बापाच्या आठवणीत एक झाड लावावं, माहेरी आलेल्या लेकीने आपली आठवण म्हणून झाड लावावं, ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून आलो म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये 2 झाडं लावावीत, असा सल्ला इंदोरीकर महाराजांनी दिला.
चाहत्यांना शांततेचे आवाहन
इंदोरीकर महाराजांचे समर्थक मोर्चे आणि आंदोलनाच्या तयारीत आहेत. सोशल मीडियावर तशी चर्चाही आहे. ‘चलो अहमदनगर’ असा नारा समर्थकाकडून लगावला जात आहे. पण इंदोरीकर महाराजांनी आपल्या समर्थकांना असं काहीही करू नका अशी विनंती केली आहे. जे काय आहे ते कायद्याने सिद्ध होईल असंही ते म्हणाले आहेत. इंदोरीकर महाराजांनी चाहत्यांना विनंती करणारं एक पत्रक जारी केलं आहे.
काय म्हटलेय पत्रकात?
आपण कोणीही, कोठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहे. तरी सर्वानी शांतता राखून सहकार्य करावं, अशी विनंती.
Post a Comment