आयटीबीपीच्या जवानाचा जवानांवर गोळीबार: 5 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी


माय अहमदनगर वेब टीम

नारायणपूर - छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या कॅम्पमध्ये अचानक गोळीबार झाला. बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी काही गोष्टीवरून भडकलेल्या जवानाने अचानक बेछूट गोळीबार सुरू केला. यानंतर तेथे उपस्थित जवानांपैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच इतर 3 जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना नारायणपूर जिल्ह्यातील आयटीबीपी कॅम्पमध्ये बुधवारी सकाळी 9 वाजता घडली. मीडिया रिपोर्टनुसार, आयटीबीपी जवान गेल्या काही दिवसांपासून सुट्टी मिळवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, त्याचे अर्ज मान्य होत नसल्याने तो नैराश्यात होता. याच कारणावरून बुधवारी त्याचा वाद झाला आणि संतापाच्या भरात त्याने कॅम्पमध्ये त्याने गोळीबार केला. परंतु, या गोळीबाराच्या कारणावर अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही. तसेच या प्रकरणाचा सध्या सविस्तर तपास केला जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post