माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शहरातील कोठी येथील सुजाता सुरेश मकासरे (वय 45) या महिलेचा डेंग्यूच्या आजाराने बुधवारी (दि.11) सकाळी मृत्यू झाला. डेंग्यू सदृश्य आजाराने त्या काही दिवसापासून आजारी होत्या. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागातील संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. वारंवार मागणी करुन देखील महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. कोठी येथे अनेक भागात अस्वच्छता पसरलेली असून, उघड्यावरच्या गटारी देखील तुंबलेल्या अवस्थेत आहे. या प्रश्नांवर मनपा प्रशासन व प्रभागातील नगरसेवक देखील लक्ष देण्यास तयार नसल्याचे नागरिकांनी आरोप केला आहे. या भागात अस्वच्छतेने साथीचे आजार पसरत असून, अनेक घरांमध्ये आजारी रुग्ण आढळत आहे. यावर मनपा प्रशासनाने उपाययोजना म्हणून अद्यापि औषध फवारणी व फॉगिंग देखील केलेली नसल्याची माहिती स्वप्निल शिंदे यांनी दिली.
कोठी भागातील स्वच्छतेच्या प्रश्नासंदर्भात स्वप्निल शिंदे, संजय कांबळे, सुधीर गायकवाड, सुशांत देवडे, बबलू गायकवाड, थॉमसन केदारे, रवी पोळ, शंकर शिरोळे, रावसाहेब अरुण, रमाकांत सोनवणे, योगेश कसबे, राजू कांबळे आदींसह प्रभागातील नागरिक जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यास जाणार आहेत.
Post a Comment