'त्या' बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा कायम



माय नगर वेब टीम

पारनेर- तालुक्यातील लोणी येथील मावळा येथील तॄप्ती तुपे या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निघॄण हत्या करणाऱ्या तीनही आरोपींना अहमदनगर सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम केली. न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे व न्यायमूर्ती के.के.सोनवणे यांच्या खंडपिठाने आरोपींची फाशीची शिक्षा कायम केली. सरकारी वकील अमरसिंग गिराशे यांनी सरकार व पिडीतेच्या वतीने काम पाहिले.

संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्तात्रेय अशी या नराधम आरोपींची नावे आहेत.




पारनेर तालुक्याला हादरवणाऱ्या व माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पाच वर्षांपूर्वी, २१ ऑगस्ट २०१४ रोजी तालुक्यातील लोणीमावळा येथे घडली होती.

सविस्तर माहिती अशी की, अत्याचारीत तॄप्ती तुपे अळकुटी येथे दहाव्या इयत्तेत शिकत होती. ती लोणीमावळा येथून शाळेसाठी अळकुटी येथे जात असे. घटनेच्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर अळकुटी येथून ती लोणीमावळा येथे एस.टी.ने आली. लोणीमावळ्याच्या बसथांब्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर तुपे कुटुंबियांची वस्ती आहे‌.तॄप्ती घरापासून काही अंतरावर असताना जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या आडोशाला थांबली. त्यावेळी तीच्या पाठलागावर असलेले आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी तॄप्तीला बळजबरीने ओढत जवळच असलेल्या कुकडी कालव्याच्या चारीत नेले व तीघांनीही तीच्यावर अत्याचार केले.ती ओरडू नये म्हणून आरोपी संतोष लोणकरने तीच्या नाका तोंडात चिखल कोंबला. हा चिखल श्वासनलिकेवाटे तीच्या फुफ्फुसापर्यंत पोहचला. अत्याचारानंतर आरोपी दत्तात्रेय शिंदे याने तॄप्तीचे पाय धरुन ठेवले तर आरोपी मंगेश लोणकरने तीच्या डोक्यात दगड घातला. एवढ्यावर आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी तीच्या शरीरावर,तोंडावर स्क्रू ड्रायव्हरने असंख्य वार केले. नाका तोंडात चिखल कोंबल्याने व शरीरावरील जखमांमुळे तॄप्तीचा मॄत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी तीचा मॄतदेह चारीवरील पुलाखाली लपवला.




तत्कालिन पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी या प्रकरणाचा तपास करीत चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक केली. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,खटला जलदगती न्यायालयात चालावा, या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे जन आंदोलन उभे राहिले. आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते‌. हजारे यांनी तत्कालीन मुख्यमं‌त्री पॄथ्वीराज चव्हाण, दिवंगत आर.आर.पाटील यांना पत्र लिहून उज्वल निकम यांची या खटल्यासाठी नियुक्ती करण्याची मागणी केली होती. सरकारने या मागणीची दखल घेत निकम यांची या खटल्याचे कामकाज पहाण्यासाठी नियुक्ती केली. .नगर सत्र न्यायालयात निकम यांनी या खटल्याचे काम पाहिले.नगरच्या तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तीनही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र तेथेही त्यांची फाशीची शिक्षा कायम करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post