‘मनोमिलना’ मुळे गांधी समर्थक भाजप कार्यकर्त्यांमध्ये ‘नाराजी’
माय नगर वेब टीम
अहमदनगर- भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी खा. दिलीप गांधी आणि शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्यात ‘मनोमिलन’ झाले खरे, मात्र हे मनोमिलन गांधी समर्थक भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचलेले नाही. त्यामुळे नेत्यांनी परस्पर घेतलेल्या मनोमिलनाच्या निर्णयाबाबत गांधी समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गांधी समर्थक भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही नाराजी खासगीत व्यक्त करण्यास सुरुवात केली असून त्याबाबत थेट दिलीप गांधी यांच्या कानावर ही आपली नाराजी घातली असल्याची चर्चा आहे.
नगर शहरातील राजकारणात मागील काही वर्षापासून माजी खा. दिलीप गांधी आणि माजी आ. अनिल राठोड यांच्यातील शीतयुद्ध नेहमीच पहायला मिळाले. या संघर्षात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करतानाच थेड आरोप-प्रत्यारोपाचे बाणही सोडले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांबरोबरच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्येही परस्परांबद्दल कमालीची कटूता निर्माण झाली होती. महापालिका निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही नेत्यांमध्ये कधीही सख्य पहायला मिळाले नाही. त्यामुळे हीच कटूता विधानसभा निवडणुकीतही कायम दिसून येईल काय? अशी शंका होती. परंतु आतापर्यंतच्या कटू आठवणी बाजूला ठेवत दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनाचा अध्याय अखेर बुधवारी (दि.16) प्रत्यक्षात वाचला गेला.
ज्यांनी अडचणी आणल्या त्यांनाच मदत करायची का?
हे मनोमिलन मात्र गांधी समर्थकांना अजिबात रुचलेले नाही. ज्यांनी शहराच्या राजकारणात अनेकदा आपल्याला आणि कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचे काम केले, ज्यांनी आतापर्यंत आपल्याला केवळ शीवराळ भाषा वापरली, शिव्यांची लाखोली वाहिली त्यांच्याशीच मनोमिलन करून त्यांना मदत करण्याचा निर्णय दिलीप गांधी यांना घेतल्याने समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मनोमिलन महापालिका निवडणुकीवेळीच का नाही?
मनोमिलन करायचेच होते तर महापालिका निवडणुकीच्यावेळी का नाही केले ? असा सवाल उपस्थित करत कोणत्याही कार्यकर्त्यांना विश्वासात, विचारात न घेता गांधी यांनी हा निर्णय परस्पर घेतल्याची भावना गांधी समर्थक कार्यकर्त्याने ‘नवा मराठा’ शी फोनवरून बोलताना व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी केवळ नेत्यांसाठी भांडत रहायचे, विरोधकांना अंगावर घ्यायचे आणि नेत्यांनी मात्र परस्पर मनोमिलन करायचे हे कोणते राजकारण अशी तीव्र भावना या कार्यकर्त्याने व्यक्त केली आहे. यासंदर्भात अनेक कार्यकर्त्यांनी दिलीप गांधी यांच्याशी थेट बोलून आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
विशेष म्हणजे गांधी-राठोड मनोमिलन होण्याअगोदर राठोड यांनी एकट्याने जाऊन गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांनी गांधी यांनी मनोमिलनाचा निर्णय घेतला. या दोन दिवसात गांधी यांनी समर्थक कार्यकर्त्यांशी चर्चा करायला हवी होती. परंतु तशी कोणतीही चर्चा न करता मनोमिलनाच्या दिवशी सकाळी कार्यकर्त्यांना फोन केले गेले.
अनेक वर्षाची कटूता संपविण्यासाठी अचानक घेतलेला हा निर्णय मान्य होत नसल्याचे या कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
Post a Comment