माय नगर वेब टीम
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चा पुन्हा जोर धरत असताना आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवार गटाने भाजपाची साथ सोडल्यासच दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रोहित पवार यांनी अजित पवार गटाच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवर टीका करत सांगितले की, निवडणुकीच्या काळात सामान्यांच्या प्रश्नांवर भाजपाविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता सत्तेत सहभागी होणे विरोधाभासी आहे. अशा परिस्थितीत भाजपासोबत राहून एकत्रीकरण होणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बारामतीतील आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही त्यांनी मोठा संकेत दिला. महायुतीत अजित पवारांचा गट कायम राहिला आणि त्यांना उमेदवारी मिळाली, तर शरद पवार गटाकडूनही पवार कुटुंबातीलच उमेदवार दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. पवार विरुद्ध पवार अशी लढत टाळायची असेल, तर अजित पवार गटानी भाजपपासून दूर राहावे. असे आवाहनही त्यांनी केले.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट सामना झाला होता. आता पुन्हा एकदा बारामतीत कुटुंबीयांमधील राजकीय लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली असून रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे.

Post a Comment